पावसामुळे सीईटी न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

81

गुलाब चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने, अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत. याची दखल घेत राज्य सरकारने जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काळजी करू नका

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यात मंगळवारपासून पडणा-या मुसळधार पावसाने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याठिकाणी अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी वाहतुकीचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्यामुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

या परीक्षांच्या तारखा दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोणत्याही विद्यार्थ्याचे परीक्षा देता न आल्याने नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.