अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर लक्ष ठेवण्याचे पियुष गोयल यांचे आदेश

कोविड परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साठेबाजी करत असल्यास राज्यांनी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करावी.

87

सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याचाच गैरफायदा आपला जास्तीत-जास्त फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजीचे प्रकार घडू नयेत, म्हणून वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच  केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांनी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वस्तूंचा पुरेसा साठा सांभाळून ठेवण्याची खबरदारी घ्यावी, जेणेकरुन अचानक होणारी भाववाढ शोषून घेऊन किंमती स्थिर राखण्यास मदत होईल, असेही गोयल यांनी सांगितले.

साठेबाजांवर लक्ष ठेवा

एखादा गिरणीमालक, घाऊक विक्रेता अथवा किरकोळ विक्रेता, कोविड परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साठेबाजी करत असल्यास राज्यांनी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही केंद्रीय मंत्री गोयल यांनी केली. राज्यांमध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांचा केंद्रीय मंत्री गोयल यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

शेतक-यांना प्रोत्साहन देण्याची विनंती

डाळींच्या किंमतींवर दर आठवड्याला लक्ष ठेवण्याची विनंती राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. डाळींचे गिरणीमालक, घाऊक विक्रेते, आयातदार इत्यादींची तपशीलवार माहिती भरण्यासाठी तसेच त्यांच्याकडील डाळींच्या साठ्याची माहिती भरण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना एक ऑनलाइन माहितीपत्रिका (डेटाशीट) देण्यात आली आहे. तसेच सातत्याने खरेदी होत राहिल्यास डाळींचे दीर्घकाळ उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल हे लक्षात घेऊन, खरेदीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची विनंती डाळ उत्पादक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.