अमळनेरमध्ये दोन गटातील दगडफेकीनंतर संचारबंदी लागू

119
अमळनेरमध्ये दोन गटातील दगडफेकीनंतर संचारबंदी लागू
अमळनेरमध्ये दोन गटातील दगडफेकीनंतर संचारबंदी लागू

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात ९ जून रोजी रात्री दोन गटात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे या करीता प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. अमळनेर शहरात शनिवारी सकाळी ११ वाजेपासून रविवार १२ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.

अमळनेर शहरातील दगडी गेट परिसरात शुक्रवारी ९ जून रोजी रात्री दोन गटात दगडफेकीची घटना घडली. किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि दोन गटांमध्ये दगडफेक झाली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकही जखमी झालेत. त्यानंतर या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

(हेही वाचा – उत्तर प्रदेशातील मंदिरात नमाज पठण करणाऱ्याला अटक)

अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन जोरदार दगडफेक झाली. व्यापाऱ्यांचा रहिवासी परिसर असल्याने यावेळी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेश सिंग परदेशी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३२ तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.