BMC : मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे; बुधवारपासून पुन्हा मिळणार योग्य दाबाने पाणी

105

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये ८१.४४ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यांमध्ये मुंबईकरांचा वर्षभराची तहान भागेल एवढा साठा जमा होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका जलअभियंता विभागाने अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागू केलेली कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी बुधवार ०९ ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार असल्याचे महापालिका जलअभियंता विभागाने जाहीर केले.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी ११ लाख ७८ हजार ७५१ दशलक्ष लिटर्स अर्थात ८०.४४ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही पाणी साठा कमी असून याच दिवशी मागील वर्षी ९२.६२ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर २०२१ मध्ये या सर्व तलावांत ८०.४४ टक्के एवढा पाणीसाठा होता.

(हेही वाचा Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही)

मुंबईतील पाणी साठा जुलै महिन्यातच ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने सध्या लागू करण्यात आलेली दहा टक्के एवढी पाणीकपात पुढे कायम ठेवणे योग्य नाही. त्यामुळे ही पाणीकपात मागे घेणे महापालिका प्रशासनाला बंधनकारकच आहे. त्यातच तुळशी, विहार, तानसा व मोडक सागर हे चार धरण तथा तलाव भरले असून भातसा धरण ७४.८४ टक्के आणि अप्पर वैतरणा ६४ टक्के एवढे भरले आहे. तर मध्य वैतरणा धरणही ९६ टक्के भरले असून लवकरच हे तलाव भरल्यानंतर यातील पाणी अप्पर वैतरणात सोडले जाणार असून यामुळे अप्पर वैतरणा धरणही लवकरच भरु शकेल असा विश्वास निवृत्त जलअभियंत्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आता प्रशासनाला पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. एका बाजुला पाणीकपातीमुळे अनेक जलाशयांमधील पाण्याची पातळीत वाढ होत नसल्याने योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेवटच्या बाजुला असणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता.त्यामुळे ही कपात मागे घेण्यासंदर्भात मागील आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येणार होती,परंतु ही बैठक घेण्यात न आल्याने या आठवड्यात याचा आढावा घेत ही कपात मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा BMC : पुढील आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याची शक्यता)

८ ऑगस्ट पर्यंतचा पाणी साठा

  • २०२३ : ११ लाख ७८ हजार ७५१ दशलक्ष लिटर्स (८१. ४४ टक्के)
  • २०२२: १३लाख ४० हजार ५०८ दशलक्ष लिटर्स (९२.६२ टक्के)
  • २०२१: ११ लाख ६४ हजार २०१ दशलक्ष लिटर्स (८०.४४ टक्के )
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.