मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द

103

जून महिन्यात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलाव आणि धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाल्याने मागील २७ जून पासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्यात आली होती. परंतु आता तलाव क्षेत्रात २५ टक्के पाणी साठा जमा झाला असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे तलावातील साठा सुस्थितीत असल्याने जाहीर केलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

( हेही वाचा : परशुराम घाटात सीसीटीव्ही बसवा; उच्च न्यायालयाचे आदेश)

१० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आज (दिनांक ८ जुलै २०२२) पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱया पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत २७ जून २०२२ रोजी १ लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. पण शुक्रवारी ८ जुलै रोजी ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

महापालिकेचे आवाहन 

मात्र, आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.