पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

87

येत्या रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.  कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

(हेही वाचा – आषाढी वारीसाठी रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांची सुविधा)

विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने ही सेवा सुरू केली आहे. तसेच 40 व्यक्ती एकत्रित येऊन एसटी महामंडळाची बस बुक करू शकतात, ही बस संबंधितांचे गाव ते पंढरपूरपर्यंत सेवा देण्यात येणार आहे.

गाव ते पंढरपूर विशेष सेवा

गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक पंढरपूरला येण्याची शक्यता लक्षात घेऊन गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकींग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळणार आहे. यासाठी 40 व्यक्तींची संख्या आवश्यक असून ही बस प्रवाशांना पंढरपूर येथे सोडणार आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात पुन्हा त्यांच्या गावी सुद्धा सोडणार आहे. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

विशेष गाड्यांचे नियोजन

औरंगाबाद -१२००, मुंबई -५००, नागपूर- १००, पुणे -१२००, नाशिक -१००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.