ठाकरे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचे भरमसाठ प्रस्ताव

61
महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला. त्यामुळे ठाकरे सरकार या चाचणीत कोसळणार आहे, अशी स्थिती आहे. म्हणून ठाकरे सरकारने बुधवारी, २९ जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ही बैठक या सरकारची शेवटची बैठक असावी, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे ही मंत्रिमंडळाची बैठक वादळी झाली. कारण या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस हे दोघेन्ही त्यांचे त्यांचे नामांतराचे प्रस्ताव मांडले आहेत. त्यामुळे ही मंत्रिमंडळाची बैठक आहे की बारशाचा कार्यक्रम आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्याचे जिजाऊ नगर नामकरण करण्याचा प्रस्ताव 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेने औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याआधीही शिवसेनेकडे या नामांतराची मागणी होत होती, मात्र याला काँग्रेसकडून विरोध होत होता, त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये हे करणे शक्य झाले नव्हते. मात्र आता सरकार शेवटची घटका मोजत आहे, म्हणून शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. हा विषय महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना जो किमान सामान कार्यक्रम तयार केला होता, त्या अंतर्गत नाही, असे मत काँग्रेसने मांडले आहे. तसेच नव्याने होत असलेल्या नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असाही प्रस्ताव या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही आता त्यांचे नामकरणाचे प्रस्ताव मांडले आहेत. त्यामध्ये थेट पुणे जिल्ह्याचेच जिजाऊ नगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तर शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकला बॅरिस्टर अ.र. अंतुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामकरणाच्या भरमसाठ प्रस्तावांमुळे ही मंत्रिमंडळाची बैठक आहे की, बारशाचा कार्यक्रम आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.