हिंदुत्ववादी ते हिंदुत्वद्वेष्टे; हा उलटा प्रवास कसा केलात उद्धव ठाकरे?

104

हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती झाल्याचे घोषित केले आहे. या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा अपेक्षाभंग झाला नाही. उद्धव ठाकरे यांचा प्रवास ज्या दिशेने सुरु होता, त्या अनुषंगाने हे होणं स्वाभाविक होतं. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की बाळासाहेबांनी लावलेला वटवृक्ष आता गळून पडला आहे.

( हेही वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा द्वेष करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची सलगी! )

संभाजी ब्रिगेड ही जातीयवादी संघटना आहे. बाळासाहेबांनी कधीही जात पाहिली नाही. ब्रिगेडने नेहमी हिंदुंचा आणि ब्राह्मणांचा द्वेष केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगून समाजात तेढ निर्माण केली आहे. अशा संभाजी ब्रिगेड सोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे, त्यामुळे बाळासाहेबांना आज खूप दुःख झालं असणार.

बाळासाहेबांनी जे विचार शिवसेनेत रुजवले होते, त्या विचारांचा आज अंत झाला. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामुळे अनेकांनी त्यांना गद्दार म्हटलं परंतु ती गद्दारी नसून बाळासाहेबांचे विचार सुरक्षित करण्यासाठी केलेली एक कृती होती. या कृतीला आता दुजोरा मिळाला आहे.

अनेक लोक या युतीमुळे दुःखी झाले आहेत. परंतु आता दुःख व्यक्त केल्याने काही साध्य होणार नाही. हिंदुंच्या अनेक विरोधकांमध्ये ठाकरे नामक एक आणखी विरोधक वाढलेला आहे. यापलीकडे काही घडलेलं नाही. बाबासाहेबांनी हिंदुत्वाचं वटवृक्ष लावलं होतं, आता ते वटवृक्ष पाडून हिंदुद्वेषी निवडुंग लावण्यात आला आहे. दुःख एवढंच की हे कृत्य बाळासाहेबांच्या सुपुत्राने केले आहे. आज महाराष्ट्र त्यांना प्रश्न विचारतोय, हिंदुत्ववादी ते हिंदुत्व द्वेष्टे; हा उलटा प्रवास कसा केलात उद्धव ठाकरे?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.