शिवसेना नेता संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवण्यात आले आहे. ३० मार्च २०१८ मध्ये संजय राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केले होते. याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. इतकेच नाही तर १ डिसेंबर रोजी बेळगाव न्यायालयात त्यांना हजर राहण्याचे आदेशही बेळगाव न्यायालयाने दिले आहेत. १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर न राहिल्यास राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे.
(हेही वाचा – शिवरायांवरील बेगडी प्रेम दाखवू नका, महाराजांचे नाव घेणे बंद करा! उदयनराजे यांनी मांडल्या भावना)
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका बेळगावातील स्थानिक पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरू येथे एक खळबळजनक वक्तव्य केले होते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारी आम्ही आहोत, या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा वाद पेटला आहे. अशातच राऊतांना हे समन्स बजावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले राऊत…
बेळगाव न्यायालयाकडून समन्स आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरूंगात डांबलं तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील, त्या भाषणात प्रक्षोभक काय ते कळलं नाही, २०१८ च्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे. याचा अर्थ मी न्यायालयात जावं. मग न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा. ही माझी माहिती आहे. किंवा मला अटक करावी आणि मला बेळगावच्या तुरुंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचे माझ्या कानावर आले असल्याचे राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community