राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर मैदानात; गृहमंत्र्यांंची घेतली भेट

118

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात मनसेच्या आंदोलनानंतर मनसैनिकांसह अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चौकशी आणि धरपकड सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संतप्त शब्दांत पत्र लिहिले आहे. राज ठाकरेंच्या या पत्रानंतर बुधवारी मनसे नेते बाळा नांदगावकर मैदानात उतरले असून त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.

या भेटीनंतर कारवाई सौम्य होणार?

मनसे विरोधातील कारवाईनंतर बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सुमारे २० मिनीटे चर्चा झाली. त्यानंतर नांदगावकर शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांच्याभेटीसाठी गेले. त्यांनी मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि पोलीस सह आयुक्त यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता बाळा नांदगावकर आणि गृहमंत्र्यांच्या या भेटीनंतर मनसैनिकांवरील कारवाईची धार सौम्य होणार का, हे पाहावे लागणार आहे, मात्र त्यादोघांमध्ये झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.

(हेही वाचा – ‘किरीट का कमाल’ म्हणत राऊतांचा नवा ‘बॉम्ब’! NSEL घोटाळ्याचा उल्लेख करत सोमय्यांवर हल्लाबोल)

दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर ४ मे पासून हनुमान चालिसा आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी ३ मे पासून राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान, अनेकांना नोटीसा बजावल्या तर अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. याशिवाय मनसे नेते संदीप देशपांडे आणि स्वतः राज ठाकरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.

असे म्हटले राज ठाकरेंनी पत्रात

भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसैनिकांच्या होणाऱ्या धरपकडीच्या कारवाईवर राज ठाकरे संतापले असून त्यांनी पत्रात उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. राज ठाकरेंनी पत्रात असे म्हटले, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. कशासाठी ध्वनीप्रदूषण करणारे,लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी?असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव सरकारला केला आहे.

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडला आहे की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले आतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझं एकच सांगणे आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.