इतक्या लवकर राहुल गांधींवर कारवाई करण्याची गरज नव्हती; बच्चू कडूंची प्रतिक्रिया

131

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईविरोधात आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ठाण मांडत तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले. यादरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी राहुल गांधींवर झालेली कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे.

नक्की काय म्हणाले बच्चू कडू?

विधिमंडळाबाहेर प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना राहुल गांधींवरील कारवाईवर बच्चू कडू म्हणाले की, ‘इतक्या लवकर कारवाई करण्याची गरज नव्हती. ठिक आहे, कायदा आहे. या कायद्याचा सत्तेवाल्यांनी व्यवस्थित उपयोग करून घेतला. राहुल गांधींच सदस्यत्त्व रद्द करण्यात जेवढी घाई आणि व्यवस्था होती, तेवढी सामान्य माणसाबद्दलची तत्परता सरकारने दाखवली पाहिजे.’

आमदारकी रद्द केली तर त्याचा आनंदोत्सव करू – बच्चू कडू 

दरम्यान राहुल गांधींच्या कारवाईनंतर बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार?, नियम हे सर्वांना साखेच असतात, अशा अशाचे पोस्टर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले आहेत. यासंदर्भात बच्चू कडू म्हणाले की, पोस्टर लावणारे कार्यकर्ते अति उत्साही आहेत. मला एक सांगा, तीनशे वर्षा अगोदर अंगावर जितक्या जखमा असायच्या, त्या छत्रपतींच्या काळात दागिणा समजला जायचा. स्वातंत्र्याच्या पूर्वी जितके डाव जास्त झेलत गेले, तो त्याचा दागिणा होता. हे आयुष्यातील मोठे मुल्य समजले जायचे. बच्चू कडूने जे आंदोलन केले, ते स्वतःसाठी नाही तर दिव्यांग बांधवांसाठी, शेतकऱ्यांसाठी केले होते. आणि याच्यात मला ही शिक्षा सुनावली आहे. यात दोन कलमात मला शिक्षा ठोठावली आहे. एका गुन्हात एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे, आणि दुसऱ्या गुन्हामध्ये एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे, असे मिळून दोन वर्षांची शिक्षा आहे. आणि ते दोन वर्ष मिळून एक वर्ष शिक्षा आहे. हे अज्ञानपणाचे लक्षण असल्यामुळे राष्ट्रवादी मागे आहे. अशा मुर्खपणामुळे भाजप पुढे जात आहे. यामधील त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. याप्रकरणात मी स्थगितीही घेतली आहे. पण जर शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन करता करता आम्हाला १० वर्ष शिक्षा झाली, आणि त्यामुळे आमचे सदस्यत्व रद्द झाले, तर आम्ही आनंदात त्याचा उत्सव करू.

(हेही वाचा – खासदारकी रद्द केल्यानंतर आता लोकसभा वेबसाईटवरून राहुल गांधींचे नाव हटवले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.