शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये होणार महत्वपूर्ण बैठक, काय आहे कारण? चर्चांना उधाण

90

राज्यातील मुंबई महापालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांची 29 सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महापालिका निवडणुकांसाठी बैठक

मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेना सत्तेत आहे. पक्षात पडलेली उभी फूट,राज्यात गमावलेली सत्ता यांमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिका निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक जिंकून पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळेच ही निवडणूक महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे,शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये 29 सप्टेंबर रोजी बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः मुकुल रोहातगी भारताचे नवे महान्यायवादी होण्याची शक्यता)

काँग्रेसची नाराजी दूर होणार?

महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांमधील अंतर्गत कलह याआधीही अनेकदा समोर आले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस नाराज आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत यावर तोडगा काढून नाराजी दूर करण्यावर देखील चर्चा होऊ शकते असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.