गृहमंत्री घेणार भोंग्यांवर बैठक, राज ठाकरेंना बोलावणार

102
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटमनंतर राज्य सरकार तणावात आले आहे. यानंतर एका बाजूला मुस्लिम संघटना पोलिसांना निवेदने देत भोंगे नियमित करण्याची मागणी करत आहेत, तर काही मुस्लिम संघटनांनी भोंगे न उतरवण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे आता या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत, त्यावेळी राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

३ मे नंतर स्फोटक परिस्थितीची शक्यता 

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एका गोपनीय अहवालाचा उल्लेख करत राज्यात 3 मे नंतर विस्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निवळावी म्हणून विरोधी पक्षांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघर्ष वाढवू नका. तेढ निर्माण करु नका. अशाप्रकारची कृती कुणाकडूनही झाली तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

कायदा हातात घेतल्यास कारवाई 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मी एक आढावा बैठक घ्यायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी ती बैठक घेतली. काही दिवसांमध्ये राज्यात जी काही परिस्थिती उद्भवू शकते त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणीसाठी काय तयारी केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला सरकार अतिशय गंभीरतेने घेत आहे. कायदा कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.