बेल आणि जेलमधील नेत्यांना घरी बसवा; J P Nadda यांचे आवाहन

111
एकीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र आलेले इंडिया आघाडीचे नेते यातून योग्य निवड करून देशाच्या विकासाची गंगा नव्या वेगाने वाहती राखण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदी बसवू या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda)  यांनी शुक्रवारी गोंदिया येथील जाहीर सभेत बोलताना केले. ज्यांचे अनेक नेते जेलमध्ये आणि अनेक जण बेलवर आहेत, अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या आघाडीला कायमचे घरी बसवा, असेही ते म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा – गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे आदी यावेळी उपस्थित होते.

मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलली

लोकसभेची ही निवडणूक केवळ एका खासदारास विजयी करण्याची निवडणूक नसून दोन विचारधारांची लढाई आहे. विकासाची राजनीती, देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प आणि देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देणे, मोदींना सत्तेवरून हटविणे आणि विकासाला विरोध करत भ्रष्टाचाराची पाठराखण करणे एवढाच घमंडी आघाडीचा अजेंडा आहे, असा स्पष्ट आरोप करीत नड्डा यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा तपशीलवार पाढाच या सभेत वाचला. मोदी सरकारने देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून याआधी केवळ उच्चनीच, शहरी-ग्रामीण आणि जातीधर्माच्या नावाने होणाऱ्या राजकारणास हद्दपार केले. मोदी यांनी राजकारणाची परिभाषाच बदलून टाकली असून आता विकासाचे राजकारण केंद्रस्थानी आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर व सबका साथ सबका विकास, सबका प्रयास या नीतीने देशाच्या राजनीतीला नवी दिशा मिळाली आहे, असे J P Nadda म्हणाले.

भगिनींची या त्रासातून मुक्तता केली

गाव, गरीब, वंचित, पीडित, शोषित, दलित, युवा, किसान, महिला यांची जेथे काळजी घेतली जाते, तेथे विकास, समृद्धी आणि उत्कर्ष साधला जातो. मोदीजींच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात गावागावात पक्के रस्ते झाले, वीज पोहोचली. देशातील अडीच कोटी घरे मोदी यांच्या सौभाग्य योजनेमुळे विजेने उजळली, आज देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य मिळते. 25 कोटी लोकसंख्या गरीबीतून मुक्त झाली, ही भारताची समृद्धी आहे. काँग्रेसच्या काळात गरीब महिलांना जळणासाठी लाकडे गोळा करण्याकरिता पायपीट करावी लागायची, चुलीच्या धूरात गुदमरण्याची वेळ यायची, आज दहा कोटी भगिनींना उज्ज्वला योजनेतून गॅस जोडण्या देऊन मोदी यांनी भगिनींची या त्रासातून मुक्तता केली आहे, असेही नड्डा म्हणाले.
2014 पूर्वीच्या भारतात, ग्रामीण भागांतील महिलांना सूर्योदयापूर्वी आणि रात्री, नैसर्गिक विधींसाठी घराबाहेर जावे लागायचे. महिलांची प्रतिष्ठा पणाला लावणारे हे लाजीरवाणे प्रकार बंद करण्यासाठी मोदीजींनी घरोघरी स्वच्छतागृहे दिली आणि महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला, असे ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेतून पाच लाखांचे विमा कवच देऊन मोदी यांनी 55 कोटी लोकांच्या आयुष्याला सुरक्षितता दिली. महामार्ग, रेल्वे, विमानसेवांचे जाळे या देशाच्या प्रगतीच्या पाऊलखुणा आज सर्वत्र उमटल्या असून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर येत्या पाच वर्षांत देशातील सर्व रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची होऊन देशाचा संपूर्ण कायापालट झालेला दिसेल, अशी ग्वाही देखील नड्डा यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.