न्यायालयापेक्षा पालिका सर्वोच्च आहे का? राणेंच्या बंगल्याबाबत महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल

89

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याचे काही काम अनधिकृत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला होता. मुंबई महापालिकेच्या पथकाकडून राणेंच्या अधिश बंगल्याची पाहणीदेखील करण्यात आली होती. बंगल्याचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास महापालिकेने ठाम नकार दिला होता. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगले. त्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सत्ताबदल होताच, महापालिकेने नारायण राणे यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास अनुकुलता दर्शवली आहे. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आली आहे.

न्यायालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका उच्च न्यायालयापेक्षा श्रेष्ठ आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना, महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास ठाम नकार दिला होता. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महापालिकेने हे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची तयारी दर्शवली आहे.

( हेही वाचा: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर गुन्हा दाखल; 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप )

उच्च न्यायालयाने खडसावले

परंतु तेव्हा महापालिकेने नकार दिल्याने, राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत राणे यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र, आता महापालिकेच्या बदललेल्या भूमिकेची न्यायालयाने दखल घेतली. तसेच महापालिकेला न्यायालयापेक्षा सर्वोच्च आहात का? असा सवालही उच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.