शरद पवारांचं ‘झूठ बोले कौआ काटे’; औरंगाबाद नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक

107

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खोटं बोलत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. यावरुन जलील यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच, शरद पवारांच्या परस्पर दोन भिन्न प्रतिक्रियांवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना, जलील यांनी हे वक्तव्य केले.

शरद पवार यांचे दोन परस्परविरोधी प्रतिक्रियांचे व्हिडीओ शेअर करत, इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांना झूठ बोले कौआ काटे …. असे म्हटले आहे.

पहिल्या व्हिडिओतील पवारांचे मत

खासदार जलील यांनी पोस्ट केलेल्या दोन दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत शरद पवार म्हणाले आहेत की, मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला होता तेव्हा काहींची मते भिन्न होती. पण त्यावेळेला राज्य एका संकटातून जात होते. त्यामुळे मविआमध्ये अतंर्गत मतभेद आहेत, असे चित्र बाहेर दिसू नये, सामंजस्याने निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये झाली आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

( हेही वाचा: RBI ने ‘या’ तीन बँकांना ठोठावला दंड; यामध्ये तुमचे अकाऊंट तर नाही ना? )

दुस-या व्हिडीओत काय?

शरद पवार हे औरंगाबादच्या दौ-यावर नुकतेच येऊन गेले. त्यावेळी त्यांना संभाजीनगरवर प्रतिक्रिया विचारली असता, हा निर्णय शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला गेला, तेव्हा आमचा सुसंवाद नव्हता. निर्णय घेतल्यानंतर आम्हाला कळलं. मंत्रिमंडळाची एक कामाची पद्धत असते. त्यात मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो. तिथे मतं व्यक्त केली जातात. पण अंतिम मत त्यांचे असते. त्यावेळी मते भिन्न होती. ही वस्तुस्थिती आहे.

शरद पवारांच्या या वक्तव्यांचे व्हिडीओ शेअर करत इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. तसेच, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.