Cabinet Expansion : एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला?

पावसाळी अधिवेशनानंतर होईल विस्तार...

174
Cabinet Expansion : एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला?
Cabinet Expansion : एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला?

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात होते. आज किंवा उद्याच हा विस्तार होईल असेही सांगितले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर संभाव्य मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर आमदारांमध्ये उत्सुकता होती. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द केल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले. परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही उलट दिवसभर आपल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली गाठावी लागली.

गेली तीन दिवस सलग बैठका घेऊनही शिंदे सरकारचे खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांमध्ये कोणत्या पक्षाकडे कोणती खाती द्यायची याबाबत एकमत होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. यामुळे तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये आणि इच्छुक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी वितरित)

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात आमदारांची नाराजी नसावी आणि अधिवेशन सुखरूप पार पडावं म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता विस्तार अधिवेशनानंतरच केला जाणार असल्याची चर्चा आहे. पण पडद्यामागे नेमकं काय घडतंय? वर्ष उलटलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? आणि आगामी काळात याचे काय पडसाद उमटतील? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. याला आता तब्बल दहा दिवस उलटून गेले पण तरीही या मंत्र्यांचं खाते वाटप झालेलं नाही, तर दुसऱ्या बाजूला मंत्रिपदाचं आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.