राज्यसभा निवडणुकीतील मविआच्या दोन मतांचा फैसला गुरुवारी होणार

102

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनाही मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादीने दाखल केलेल्या अर्जाला आता ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः राऊतांची हितेंद्र ठाकूरांवर स्तुतीसुमने, राज्यसभेत ठाकूरांच्या बविआचा मविआला होणार फायदा?)

ईडीचा युक्तिवाद

अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. पण हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे असून त्यांना राज्यसभेसाठी मतदान करायला परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई सत्र न्यायालयात करण्यात आली होती. या मागणीवर बुधवारी सुनावणी पार पडली. या मागणीला ईडीकडून विरोध करण्यात आला असून, कैद्यांना मतदानाचा हक्क नसल्याचा युक्तिवाद ईडीकडून न्यायालयात करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून, गुरुवारी सकाळच्या सत्रात याचा निकाल सुनावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज्यसभा निवडणूक : समाजवादीची दोन मते शिवसेनेला मिळणार, बविआचे काय?)

तरी आमचे उमेदवार जिंकतील

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मते मिळाली नाहीत तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, असे स्पष्ट मत काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. ही निवडणूक आमच्यासाठी अजिबात अवघड नाही. आम्हाला अपक्षांसह मित्र पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या दोघांच्या मतांशिवाय ही निवडणूक आम्हाला जिंकता येईल, असे थोरात यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः राज्यसभा निवडणुकीत मनसेच्या एकमेव आमदाराचे मत कोणाला? राज ठाकरेंचा निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.