कोविड टेंडर घोटाळा : ‘पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा’ – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

170
कोविड टेंडर घोटाळा : 'पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा' - उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीची छापेमारी हा चर्चेचा विषय बनला आहे. तसेच यावरून राजकारण देखील तापलं आहे. कोविड टेंडर घोटाळा प्रकरणी ईडीकडून ठाकरे गटाचे सचिव आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका करत काही प्रश्न विचारले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छापेमारीवरून थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं आहे. घोटाळ्याचीच चौकशी करायची असेल तर राज्यातील इतर महापालिकांचीही चौकशी करा, असं आव्हान देतानाच त्यांनी थेट या महापालिकांची नावेच जाहीर केली आहेत. त्यामुळे आता राज्यसरकार त्यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे हे शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी, “कोरोना काळात एपिडेमिक अॅक्ट होता. पंतप्रधानांनी हा अॅक्ट आणला होता. अशा परिस्थितीत नियमांच्या पलिकडे जाऊन काम करावे असा हा कायदा म्हणतो. त्यामुळे केंद्र सरकारनेही या कायद्याचा आधार घेऊन खरेदी केली. अनेक महापालिकांनीही कोरोना नियंत्रणासाठी खरेदी केली होती. चौकशीच करायची असेल तर ठाणे पालिकेची करा. पिंपरी चिंचवडची करा. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीच ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचं काय झालं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

पीएम केअर फंडाची चौकशी करा

उद्धव ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, चौकशी करायचीच असेल तर पुणे महापालिकेची करा. नागपूर महापालिकेची करा. तुमच्यात हिंमत असेल तर देशातील सर्वच राज्यांच्या राज्यकारभाराची चौकशी करा. पीएम केअर फंडची चौकशी करा. टाटाने दीड हजार कोटी दिले ते गेलेच ना. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालाय ते आमची काय चौकशी करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

आम्हाला ईडीचा अधिकार द्या

समान नागरी कायदा म्हणता मग ईडी सीबीआयचा अधिकार आम्हाला द्या. आम्ही सांगतो धाडी टाकायला. तुमच्या घोटाळ्यावर राहुल गांधी यांनी सवाल केला. अरविंद केजरीवाल यांनी सवाल केला. त्याचं उत्तर दिलं जात नाही. प्रश्न विचारला तर कारवाई होते. पण उत्तर देत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.