सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला राजकीय वळण लाभले आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
काय आहे पटोलेंच्या पत्रात?
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये फक्त पुरुष सुरक्षा रक्षकच नेमले जातात. त्याऐवजी महिलांनाच सुरक्षा रक्षक म्हणून नेमले जावे, अशी मागणी या पत्राद्वारे पटोलेंनी केली आहे.
(हेही वाचाः राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)
राज्याचा नावलौकिक जपण्याची गरज
या पत्रात नाना पटोलेंनी देशभरात महिलांच्या सुरक्षेविषयी महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेचा उल्लेख केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्राचा नावलौकिक कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना हा सल्ला
राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला दिल्या. त्याला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पत्र लिहीत उत्तर दिले होते. त्या पत्राबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. असे पत्र पाठवण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची नीट खातरजमा करुन घ्यावी, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच अशाप्रकारे या प्रकरणाला राजकीय वळण देणे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.
(हेही वाचाः पत्र पाठवण्याआधी मुख्यमंत्र्यांनी प्रकरण समजून घ्यावे! फडणवीसांचा खोचक सल्ला)
Join Our WhatsApp Community