शिवसेना म्हणतेय ‘मराठी माणसांनी एकजूट बांधावी!’

आपल्यातीलच काही लोकांमुळे हिंदुत्वाला धोका असल्याचे आहे, ही मंडळी इंग्रजांनी आणलेल्या नीतीचा म्हणजे 'तोडा, फोडा आणि राज्य करा', याचा अवलंब करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये वाद निर्माण करायला निघाले आहेत, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

98

भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी कट्टा कार्यक्रम राबवून मराठी माणसांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचे चित्त विचलित झाले असून मागील काही वर्षांपासून मराठी माणसांना विसरलेल्या शिवसेनेने मराठी माणसांना एकजूट बांधण्याचे आवाहन केले आहे. हिंदुत्वाला धोका नसला तरी काही येथे उपटसुंभ तयार झाले असून त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला. त्यामुळे तोडा-फोडा राज्य करा, या पध्दतीचा पुन्हा वापर होवू शकतो. त्याकरता सर्व मराठी माणसांनी एकजूट बांधण्याची गरज असल्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलतांना केले.

सत्तेसाठी इंग्रजांची नीती वापरली जातेय!

शिवसेनेचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. या प्रसंगी बोलतांना उध्दव ठाकरे यांनी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्याबाबत चिंता व्यक्त केली. उध्दव ठाकरे यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी दाखवलेल्या हिंमतीचे अभिनंदन करत ‘हीच हिंमत मुंबई-महाराष्ट्रात अभिप्रेत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात जर कुणी वार करायला येणार असेल, तर त्याला मोडून, तोडून त्यांचे पार्सल परत पाठवा. आज या देशात हिंदुत्वाला धोका नाही. परंतु आपल्यातीलच काही लोकांमुळे हिंदुत्वाला धोका असल्याचे सांगत ही मंडळी इंग्रजांनी आणलेल्या नीतीचा म्हणजे ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’, याचा अवलंब करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये वाद निर्माण करायला निघाले आहेत. म्हणून मराठी माणसांनी आपली एकजूट बांधली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा-मराठेत्तर, बाह्मण-बाह्मणेत्तर, भंडारी, माळी आदी समाजातील सर्व मराठी माणसांनी एकजूट व्हायला हवे. मराठी किंवा अमराठी या वादात न पडता आपण हिंदु आहोत हेच लक्षात ठेवायला हवे. सर्व हिंदुंनी एकजूट व्हायला पाहिजे, असेही आवाहन करत ठाकरे यांनी हिंदु तितुका मेळवावा, हिंदु धर्म वाढवावा, असा मंत्र दिला. मुंबई महाराष्ट्राला मिळून ६० वर्षे पूर्ण झाले. पण साठ वर्षांत एकही मराठी भाषा भवन उभे राहिले नाही. ते मराठी भाषा भवन या मुंबईत उभारले जात असून त्याचे काम सुरु असल्याचेही उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा : मी मुख्यमंत्री आहे, असे मला कधीच वाटणार नाही! मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.