वर्षावर जाण्यापूर्वी आम्हाला बादलीभर लिंबू सापडले; शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

96

मुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘वर्षावर जाण्यापूर्वी आम्हालाही बादलीभर लिंबू सापडले होते’, असा घणाघात शिंदे यांनी शुक्रवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केला.

( हेही वाचा : महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘मनसे’ सज्ज! मुंबईतील प्रत्येक मतदार संघामध्ये होणार सभा)

शिंदे म्हणाले, अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही नागपुरातील काही वास्तूंना भेट दिली. त्यावरही यांनी टीका केली. रेशीमबागेत लिंबू, टाचण्या पडल्यात का, हे तपासा, असे ते म्हणाले. खरेतर आम्ही वर्षावर गेलो, तेव्हा बादलीभर लिंबू सापडले. लिंबू-टिम्बूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांसह प्रबोधनकारांच्या विचारणाही तिलांजली दिली आहे.

मी कुणावरही पातळी सोडून बोलणारा नाही. रेशीम बागेत गेल्यावर आम्हाला काय काय म्हणून हिणवले? आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर सरकार स्थापन केले म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो. गोविंद बागेत तर गेलो नाही, असेही शिंदे म्हणाले. एखादा माणूस चुकीचा असू शकतो, ५ माणसे चुकू शकतात; पण ५० जण चुकीचे आणि मी बरोबर असे कसे म्हणता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आम्ही घेणारे नाही, देणारे आहोत!

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही घेणारे नाही, देणारे आहोत. आमच्याकडे देना बँक आहे. उद्योगाच्या उपसमितीची बैठक आधीच्या काळात १७ ते १८ महिने घेतली गेली नाही. महाराष्ट्रातील उद्योग पळवले जातात, अशी आवई ते उठवत आहेत. मला सांगा दोन तीन महिन्यात एखादा उद्योग येतो आणि जातो, असं कधी होत का, असा प्रश्न शिंदे यांनी विरोधकांना विचारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.