वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचे शरद पवारांना आव्हान

134

वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे. वीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध नाही. ते विज्ञानवादी होते. त्यामुळे वीर सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवने योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी शरद पवारांना एक आव्हान दिले आहे.

केवळ बोलघेवडेपणा करू नये

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले की, ‘वीर सावरकर हा काही पक्षाचा विषय नाही. वीर सावरकर हा देशाचा विषय आहे. वीर सावरकर हा देशभक्तीचा विषय आहे. वीर सावरकर हा देशभक्तीने जाज्वल्य जगवणारा आणि जगण्याचा विषय आहे. त्यामुळे वीर सावरकरांच्या मुद्द्यावरच राजकारण भाजपला मान्य नाही. शरद पवारांना वीर सावरकरांची बदनामी करणे योग्य वाटत नसेल. तर त्यांनी वीर सावरकर या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचा गौरव कार्यक्रम, सन्मानपूर्व उल्लेख कार्यक्रम किंवा त्यांची गौरव यात्रा काढावी. केवळ बोलघेवडेपणा करू नये. ही आमची त्यांना नम्र विनंती आहे.’

मुंबईत ३६ विधानसभांमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा

दरम्यान मुंबईतील ३६ विधानसभांमध्ये येत्या पाच दिवसांत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपटाचे देखावे, गीते, त्यांचे विचार याचे विविध चित्ररथ तयार करून ही यात्रा काढण्यात येणार आहे. जे जे सावरकर भक्त आहेत त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी केवळ भाषणांध्ये वीर सावरकर प्रेम दाखवण्यापेक्षा या वीर सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन ही शेलार यांनी केले.

(हेही वाचा – …तर ठाकरे किंवा संजय राऊतांनी, राहुल गांधींच्या फोटोला चप्पलने मारून दाखवावे; बावनकुळेंचे आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.