महाराष्ट्रात हिंदू धर्म सुरक्षित नाही, शेलारांचा घणाघात

87

महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी “राजकारणाचे गुन्हेगारीकरण” या विषयावर आपले विचार मांडताना ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडाचा समाचार घेत हे सरकार महाराष्ट्र धर्म आणि हिंदू विरोधी असल्याची खरमरीत टीका केली. ठाकरे सरकार हे गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकता माजवणा-यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजपा संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले आशिष शेलार ?

भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी बैठक दादर येथे झाली. या बैठकीत शेलारांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणी सारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर, प्रथम गुन्हयांचे समर्थन करण्यात आले आणि पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. पुढे आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे समर्थन करण्यात आले आणि आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे. असा, आरोप शेलारांनी केला आहे. कॉंग्रेसच्या अमरावतीच्या मंत्र्यांनी एका पोलीस शिपायाला मारले त्यांच्यावरचा गुन्हा सिध्द झाला पण, त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणी काहीही बोलत नाही.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक आणि जवळच्यांवर छापे पडले करोडोची बेनामी मालमत्ता सापडल्याचे केंद्रीय यंत्रणा सांगते आहे ही मालमत्ता कुठून आली याबाबत कोणी बोलत नाही. बीडच्या मंत्र्यांबाबत काय सांगावे? अहमदनगरच्या एका मंत्र्यांच्या पीएने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली पण त्या मंत्र्यांना कोणी दोष देण्यास तयार नाही. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्यांने संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली ती मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही. चंद्रपूरच्या एका मंत्र्यांचे दोन पासपोर्ट सापडले तर परिवहन मंत्र्यांचे म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचे उघड झाले. गृहनिर्माण मंत्र्याविषयी एका अभियंत्याने सोशल मिडियावरुन प्रतिक्रिया दिली तर त्याला मंत्र्यांच्या अंग रक्षकांनी बेदम मारहाण केली. मंत्र्यांना अटक कधी झाली, सुटका कधी झाली कळले नाही पण सरकार काही बोलायला तयार नाही. असे म्हणत शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत

एक मंत्री तर १९९३च्या बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या फाशीचा विरोधक आहे. अल्पसंख्याक मंत्री तर दाऊदची बहिण हसीना पारकरचा कट्टर समर्थक असलेल्या सलिम पटेल सोबत तसेच, स्फोटातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपी सरदार शहावली खान सोबत आर्थिक व्यवहार करतात. मुख्यमंत्री याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. असे म्हणत, शेलारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. शर्जिल उस्मानीला रेडकार्पेट घातले जाते. आझाद काश्मिरचा बोर्ड फडकवणा-या मेहक प्रभूवरील गुन्हा मागे घेतला जातो. कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडिस काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. या राज्यातील तक्रारदार, तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षित नाहीत. असा आरोप शेलारांनी सरकारवर केला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रात ‘काय ते द्या’चं राज्य”; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा )

महाराष्ट्रात भयाण चित्र

पोलिसांना वसूलीची कामे दिली जात आहेत. ज्या रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदलीतील भ्रष्टाचार उघड केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. असे, भयाण चित्र महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे पालघरमध्ये सांधूंना मारले जाते, गणेशोत्सव, दहिहंडी उत्सवावर बंदी आणली जाते. वारक-याला पंढरपूरात जाऊ दिले जात आहे. राम मंदिराच्या तारखेची आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली जाती. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित नाही तसाच महाराष्ट्र धर्मही सुरक्षित नाही अशा शब्दात आमदार आशिष शेलारांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.