२०२१ वर्ष जागतिक तापमान वाढीचा उच्चांक मोडणार! 

सध्याचे तापमान १ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान भविष्यात २ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जरी तापमान १.५ डिग्री सेल्सिअस राहिले, तरी भारतात प्रचंड उष्ण लहरींचा प्रकोप वाढणार आहे. विशेषत: हे तापमान सर्वाधिक दक्षिण आशियात वाढेल आणि २१ व्या शतकाच्या शेवटी भारतात जीवन असह्य होईल.

119

२०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक उष्ण लहरींची वर्षे ठरली आहेत. त्याप्रमाणेच २०२१ हे वर्षसुद्धा अति तापमानाचे आणि उष्ण लहरींचे वर्ष ठरणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या वतीने मार्च ते मे २०२१ ह्या कालावधीत देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१ (Global climate risk Index) नुसार भारत हा धोक्याच्या ७ व्या क्रमांकावर आहे. जंगलतोड, शहरीकरण आणि प्रदूषण ह्या घटकामुळे भविष्यात पुन्हा तापमान वाढ आणि उष्ण लहरींचा धोका निर्माण होणार आहे.

हवामान विभागाचा इशारा

मार्च महिन्याच्या शेवटी हवामान विभागाने उष्ण लहरीचा इशारा दिला आहे. परंतु त्या आधी विभागाने उन्हाळ्यात वाढणाऱ्या उष्ण लहरीचा इशारा दिला होता. 2 मार्च २०२१ रोजी भारतीय हवामान विभागाच्या इशार्‍यानुसार येत्या उन्हाळ्यात मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ डिग्री सेल्सिअस अधिक किंवा अत्याधिक असेल, हवामान विभागांचे संचालक मृत्युंजय महापात्रा ह्यांचे मते मार्च ते मे २०२१ मध्ये दिल्ली, चंडीगड, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान व उष्ण लहरीचे प्रमाण वाढणार असल्याने तेथील लोकांनी सावध असले पाहिजे, असे म्हटले आहे. ह्या सोबतच हिमाचल प्रदेश, कच्छ, राजस्थान, उत्तराखंड, मेघालय, अरुणाच, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, बिहार ह्या प्रदेशात सुद्धा तापमान वाढलेले असेल. दक्षिण भारतात तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशात तापमान ०.५ डिग्री सेल्सिअस अधिक राहील.

(हेही वाचा : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस! फळ बागायतदार शेतकरी चिंतेत  )

जागतिक संस्थांचा इशारा

सध्याचे तापमान १ डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान भविष्यात २ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जरी तापमान १.५ डिग्री सेल्सिअस राहिले, तरी भारतात प्रचंड उष्ण लहरींचा प्रकोप वाढणार आहे. विशेषत: हे तापमान सर्वाधिक दक्षिण आशियात वाढेल आणि २१ व्या शतकाच्या शेवटी भारतात जीवन असह्य होईल, असा गंभीर इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. २०२० मध्ये वातावरणातील कार्बन वायूचे प्रमाण रेकॉर्ड ब्रेक ४१७ पी पी एम इतके वाढले आहे, त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून त्यामुळे अत्याधिक हवामान बदल घडत असून त्यामुळे भविष्य काळात जीवन असह्य होणार असल्याचा इशारा नासा, गोडार्ड इंस्टिट्युट, नोवा, आय पी सी सी, यु एन इ पी, जर्मन वाँच, जागतिक आणि भारतीय हवामान विभागाने दिला आहे. नासाच्या सर्वेक्षणानुसार २०२० हे वर्ष सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले. गोडार्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडीस ह्या संस्थेच्या मते १९५१-१९८०च्या सरासरी तापमानाच्या आकडेवारीनुसार तुलनेने सध्याचे तापमान १.०२ डिग्री सेल्सिअस वाढले आहे. २०१३ ते २०२० हे ७ वर्षे सर्वाधिक तापमान वाढीचे वर्षे ठरले. ह्यामुळे उत्तर दृवावरील बर्फ दर दशकात १३ % ने कमी होत आहे.

(हेही वाचा : श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?)

भारतात पावसाळा १ महिन्याने पुढे गेला!  

खऱ्या अर्थाने उष्ण लहरींची सुरुवात २०१५ पासून सुरु झाली आणि भारत आणि पाकिस्तानात आतापर्यंतची ५ वी सर्वाधिक उष्ण लहर आली होती. ह्यामुळे ३५०० लोकांचा मृत्यू झाला होता. एका अभ्यासानुसार वाढती लोकसंख्या आणि वाढते तापमान ह्यांचा संगणक स्टीमुलेषण अभ्यास करण्यात आला, त्यात दक्षिण आशियात जर तापमान १.५ आणि २ डिग्री सेल्सिअस वाढले तर आरोग्यावर काय परिणाम होतील आणि काय धोके होतील ते तपासण्यात आले. ग्लोबल क्लायमेट रीस्क इंडेक्स- २०२१ च्या जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार जगातील अति धोकाग्रस्त १० देशांच्या यादीत भारताचा ७ वा क्रमांक लागतो. ह्या यादीत अनुक्रमे – १) मोझांबिक २) झिम्ब्वाम्बे 3) वाहामा ४) जपान ५) मलावी ६) अफगाणिस्तान ७) भारत ८) साउथ सुदान ९) नायजर आणि १०) बोलिविया देश आहेत. ह्यात भारताचा स्कोर १६.६७ असून मानवी विकास निर्देशांक १३१ आहे. ह्या अहवालानुसार हवामान बदलाचा परिणाम भारताच्या वार्षिक पर्जन्यमानावर झाला असून पावसाळा १ महिन्याने पुढे गेल्याचे म्हटले आहे. २०१९ मध्ये ११० % पाऊस पडला, जो १९९४ नंतर कमी दिवसात जास्त पडलेला पाऊस आहे. पुरामुळे १४ राज्यांत १८०० लोकांचे मृत्यू झाले, १.५ दशलक्ष लोकांना हलवावे लागले आणि एकूण १.८ दशलक्ष लोकांवर सरळ परिणाम झाला. ह्यामुळे देशाचे १० दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले. २०१९ ह्या एकाच वर्षी ८ मोठे चक्रीवादळे आली, फनी नावाचे सर्वाधिक नुकसान करणारे वादळ आले आणि २८ दशलक्ष लोकांवर त्याचा परिणाम झाला. आर्थिक नुकसानीबाबत अहवालात म्हटले आहे कि भारताचे ६८८१२.३५ दशलक्ष डोल्ररचे नुकसान झाले असून जी डी पी मध्ये ०.७२ % घट झाली आहे.

(हेही वाचा : राज्यात उष्णतेची लाट, प्रकृती सांभाळा! )

जगाचे मोठे नुकसान

२००० ते २०२० ह्या दोन दशकात जगात ४५७,००० लोकांचा हवामान बदलाच्या घटनांमुळे मृत्यू झाला, तर २.५६ ट्रीलीयन डॉलरचे नुकसान झाले, ११०० नैसर्गिक आपत्तीच्यां घटना घडल्या. UNEP २०१६च्या अहवालानुसार २०३० मध्ये १४० दशलक्ष डॉलर आणि २०५० मध्ये २८० दशलक्ष डॉलरचे नुकसान होणार आहे. IPCC संस्थेच्या अहवालानुसार १.५ डिग्री सेल्सिअसतापमान वाढीमुळे सर्व आपत्तीची किंमत ५४ ट्रीलीयन डॉलर होईल. मानव, वन्य जीवांचे मृत्यू आणि आर्थिक नुकसानीसोबतच अत्याधिक तापमान वाढीमुळे आणि उष्ण लहरीमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार आहे. तापमान वाढीमुळे जमिनीवरील जलसाठे कमी होईल, ध्रुव प्रदेशातील आणि हिमालयावरील हिमनग वितळतील, समुद्र पातळीत वाढ होईल, मान्सूनवर परिणाम होईल, मोठी चक्रीवादळे, वादळी पाऊस, महापूर येतील, उष्ण लहरीत वाढ होतील, जंगलांना आगी लागतील, शहरात आगी लागतील, वनस्पती-प्राणी ह्यांचे अधिवास नष्ट होतील आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील.

 – प्रा सुरेश चोपणे, चंद्रपूर.
पर्यावरण आणि हवामान अभ्यासक
अध्यक्ष – ग्रीन प्लॅनेट सोसायटी.
सदस्य – रिजनल अम्पोवर कमिटी, केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल, वायू परिवर्तन मंत्रालय, दिल्ली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.