-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात बेकायदा सुरू असलेल्या जीन्स प्रक्रिया कारखान्यांमुळे वालधुनी व उल्हास नदीचे पाणी विषारी होत आहे. जीन्स वॉश युनिट्सच्या ६० पैकी फक्त एकावर मोठा गाजावाजा करत कारवाई केली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे शासन-प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वालधुनी-उल्हास नदी संवर्धन समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर कल्याण येथील वीज वितरण मुख्य कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. (Kalyan)
फक्त एकावर कारवाई… साठ युनिट्स मोकाट
कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगर क्षेत्रात सुमारे साठ जीन्स वॉश युनिट्स बेकायदा सुरू आहेत. याबतची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज वितरण कंपनीला दिली होती. त्यानंतर अशा बेकायदा जीन्स वॉश युनिट्सचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही दिले होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व युनिट्सचे वीज मीटर काढून आणल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात तिसऱ्याच दिवशी सर्व जीन्स वॉश युनिट्स पुन्हा सुरू झाली. कारवाईचा बडगा केवळ एकाच युनिटवर उगारण्यात आला. गुरूवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चिंचपाडा येथील एका कारखान्यावर जेसीबी चालवून तो जमीनदोस्त केला. उर्वरित एकोणसाठ युनिट्स मात्र राजरोसपणे सुरू आहेत. (Kalyan)
(हेही वाचा – India-Bangladesh Border : ऑपरेशन ‘पुशबॅक’ वरून भारत-बांग्लादेश सीमेवर खळबळ; BSF-BGB आमनेसामने, वादाचे कारण काय?)
रात्रीच्या विषारी पाण्याने नदी मृत्युशय्येवर
या कारखान्यांमधून जीन्स प्रक्रियेदरम्यान तयार होणारे रंगमिश्रित आणि रसायनयुक्त सांडपाणी रात्रीच्या वेळी थेट गटारांमध्ये आणि मोकळ्या जागेत सोडले जाते. तिथून ते वालधुनी व उल्हास नदीत मिसळते. यामुळे नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. दुर्गंधी सुटली आहे. जलचर मृत होत आहेत. परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. समाजसेवी संघटनांनी पंधरा दिवसांपूर्वीच एमपीसीबी, नपा, मनपा व वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. मात्र कारवाईच्या नावाने केवळ देखावा करण्यात आला. (Kalyan)
विधिमंडळात मुद्दा गाजूनही प्रशासन सुस्त
सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनातही कल्याणमधील वालधुनी व उल्हास नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गाजला. काही आमदारांनी जीन्स प्रक्रिया उद्योगांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. तरीही स्थानिक प्रशासनाला जाग आलेली नाही. नपा, मनपा, ग्रामपंचायत, एमपीसीबी, एमएसईबीचे अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचा आरोप वालधुनी-उल्हास नदी संवर्धन समितीने केला आहे. (Kalyan)
(हेही वाचा – पुतिनच्या यांचा सर्वात विश्वासू हेर Sergei Ivanov यांचा अंत; मृत्यू भोवती वाढले गूढ)
आठ दिवसांच्या अल्टिमेटमनंतर टाळे ठोको
स्वार्थाने पोखरलेल्या संस्था असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वीज वितरण विभाग संपूर्णपणे विफल झालेला दिसत आहे. शासकीय कार्यालयातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे, असा घणाघात वालधुनी-उल्हास नदी संवर्धन समितीने केला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत साठही जीन्स वॉश युनिट्सवर कारवाई झाली नाही तर कल्याण येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासह प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वालधुनी-उल्हास नदी संवर्धन समितीने दिला आहे. या आंदोलनात हजारो निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी सहभागी होतील, असा दावाही समितीने केला आहे. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

