-
प्रतिनिधी
BJP on Sanjay Raut संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांना ‘ऑपरेशन टायगर’च्या बाता मारण्यापेक्षा ‘ऑपरेशन गिधाड’वर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला आहे. गिधाड ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मरणावर टपलेले असते, तशीच प्रवृत्ती राऊत यांची असून, त्यांनी स्वतःच्या राजकीय कारवायांमुळेच पक्षाला मरणासन्न अवस्थेत पोहोचवले आहे, असा आरोप बनांनी केला. (BJP on Sanjay Raut)
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली. “अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवण्याचा जो प्रकार झाला, तोच आता त्यांचे खासदार अनुसरत आहेत,” असे म्हणत बनांनी राऊतांच्या पक्षातील अंतर्गत नाराजीचा मुद्दा अधोरेखित केला. महाराष्ट्र आभासी पद्धतीने चालत नसून तो कष्टातून आणि घामातून निर्माण झाला आहे, हे शिवसेना उबाठाला समजले नाही. यामुळेच भविष्यात जनताही यांना फेसबुक लाईव्हप्रमाणेच ‘व्हर्च्युअली’ घरी बसवेल, असा टोला त्यांनी लगावला. (BJP on Sanjay Raut)
(हेही वाचा – Sanjay Deshmukh : ‘मातोश्री’ला बगल देत संजय देशमुखांची थेट दिल्लीवारी; देशमुखांच्या दौऱ्यामागील गुपित काय?)
पाकिस्तानबाबतच्या भूमिकेवरूनही बनांनी राऊतांना लक्ष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत, शेजारील देशांशी चर्चेतून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावर टीका करून राऊत स्वतः पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. (BJP on Sanjay Raut)
भाजपा फोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संजय राऊतांना त्यांनी सज्जड दम दिला. अडीच वर्षांच्या सत्तेत असताना राऊतांनी भाजपाला नेस्तनाबूत करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. “संजय राऊत यांनी शंभर जन्म घेतले तरीही भाजपाचा एकही नगरसेवक फुटणार नाही,” असा दावा करत, भाजपा हा विचारांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावर चालणारा पक्ष असल्याचे बनांनी ठणकावून सांगितले. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला गेलेल्यांना भाजपाची निष्ठा काय असते, याचे शिक्षण घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. (BJP on Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

