
-
प्रतिनिधी
Sanjay Shirsat महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या तीव्र अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावा केला जात असून, काही बडे नेते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आमदारांचे नाट्य सुरू असल्याच्या चर्चा असतानाच, शिरसाट यांच्या या दाव्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कलह आणि नवे राजकीय समीकरण आकारास येणार का, अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Sanjay Shirsat)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तब्बल २२ आमदारांनी आणि काही ज्येष्ठ नेत्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या घडामोडींवर शिक्कामोर्तब करताना मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांमध्ये सध्या कुणाच्या नेतृत्वाखाली काम करावे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्षात सध्या सर्व काही अलबेल नसून, त्यातील काही महत्त्वाचे लोक थेट शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यामुळे आगामी काळात राज्यातील सत्तेची गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा – १८ वर्षांनंतर Raj Thackeray रेल्वे भरती आंदोलनातून निर्दोष मुक्त; काय होतं संपूर्ण प्रकरण?)
या अंतर्गत वादाव्यतिरिक्त जागावाटपावरूनही महायुतीत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर भाजपाने दावा ठोकला असला, तरी ही जागा शिवसेनेचीच होती आणि राहील, अशी रोखठोक भूमिका शिरसाट यांनी घेतली आहे. भाजपाचे संख्याबळ कितीही जास्त असले, तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे सांगत त्यांनी चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टाकला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुकास्तरावर संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वेगाने सुरू केले आहे. (Sanjay Shirsat)
दुसरीकडे, राष्ट्रीय राजकारणावर बोलताना संजय शिरसाट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करत असून, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल कसे बोलावे याचे भान त्यांना राहिलेले नाही, असे ते म्हणाले. याशिवाय, देशातील तरुणांना ‘कॉक्रोच’ म्हणणाऱ्यांवर निशाणा साधत, राजकीय पक्षांनी युवकांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडणे अत्यंत गैर असल्याचे सांगत शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Shirsat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
