
-
विशेष प्रतिनिधी
Raigad : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांच्या हक्काच्या रोजगाराबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडवणारी माहिती समोर आली असून, यानंतर आता प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आणि आस्थापना असतानाही, तिथल्या स्थानिक तरुणांना डावलून शेजारील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल २५० हून अधिक सुरक्षा रक्षक तिथे कार्यरत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी प्रशासनाला फैलावर घेतले असून, स्थानिक तरुणांना तातडीने नोकऱ्या देण्यासाठी एका महिन्याची डेडलाईन देत विशेष मोहीम राबवण्याचे थेट आदेश दिले आहेत.
नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीत समोर आलेल्या आकडेवारीने सर्वांनाच धक्का दिला. सध्या रायगड (Raigad) जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर तब्बल २ हजार ५३१ स्थानिक तरुण रोजगाराच्या आशेने वाट पाहत आहेत. मात्र, असे असतानाही स्थानिक पातळीवर परजिल्ह्यातील लोकांना संधी दिली गेल्याने रायगडमधील (Raigad) तरुण रोजगाराच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तरुणांमधील वाढता असंतोष पाहता, आता ठाणे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा वाद तातडीने मिटवण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – US Iran tensions: “एकतर शांतता नाहीतर विनाश“; अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची इराणला स्पष्ट चेतावणी)
या बैठकीत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांच्या संथ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यापासून ते आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे आता कालबद्ध पद्धतीने झाली पाहिजेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि खासगी संस्थांवर कडक नियंत्रण ठेवणे ही मंडळाची मुख्य जबाबदारी आहे,” असे खडेबोल त्यांनी सुनावले. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तपासणी मोहीम अधिक प्रभावी करण्याचे आदेश देत, महिनाभराच्या आत सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचा अल्टिमेटम त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन आणि कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रायगडमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्याही तापण्याची चिन्हे आहेत. स्थानिक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन खासगी कंपन्यांवर जरब बसवली जाईल, असे संकेत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आता या एका महिन्यात रायगडच्या (Raigad) किती बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
