
-
ऋजुता लुकतुके
लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य फलंदाज निकोलस पुरनने संघमालक संजीव गोयंकांचं कौतुक केलं आहे. ते कायम संघाबरोबर असले तरी क्रिकेट विषयक निर्णय ते खेळाडूंवर सोपवतात. खेळाडूंच्या मागे उभे राहतात, असं पुरनने बोलून दाखवलं. लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत झालेल्या ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत. १० गुणांसह ते सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी कुटुंबीय आणि पंजाब किंग्जच्या प्रिती झिंटाच्या बरोबरीने गोयंका हे संघाच्या घडामोडींमध्ये सक्रिय सहभागी असतात. आणि अनेकदा सामना सुरू होण्यापूर्वी आणि नंतर ते खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुममध्ये दिसतात. गेल्या हंगामात तेव्हाचा कर्णधार के एल राहुलबरोबर त्यांचे उडालेले खटके लोकांपासून लपून राहिले नव्हते. (IPL 2025, Sanjiv Goenka)
(हेही वाचा – IPL 2025, Punjab Kings : पंजाबचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या संघ निवडीवर माजी खेळाडू नाराज)
यंदाही रिषभ पंतच्या कामगिरीवर ते खुश नसल्याच्या चर्चा आहेत. पण, निकोलस पुरनने मात्र वेगळं मत व्यक्त केलं आहे. ‘ड्रेसिंग रुममध्ये त्यांचा वावर सकारात्मक असतो. ते क्रिकेटविषयी कुठल्याही बाबतीत आमच्या पाठीमागे उभे राहतात. त्यांनी खेळाडूंना पुरेशी संधी दिली आहे. अर्थात, आयपीएल हा शेवटी एक व्यवसाय आहे आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्हाला त्यांना लीग जिंकून दाखवायची आहे,’ असं पुरन पीटीआयशी बोलताना म्हणाला. (IPL 2025, Sanjiv Goenka)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : १७ पाकिस्तानी यु-ट्यूब चॅनलवर बंदी)
खुद्द निकोलस पुरन सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो विराट कोहली (४४३), सुर्यकुमार यादव (४२७), साई सुदर्शन (४१७) यांच्या खालोखाल चौथ्या स्थानावर आहे. त्याने १० सामन्यांत २०३ धावांच्या स्ट्राईक रेटने ४०४ धावा केल्या आहेत. निकोलस पुरनने पीटीआयशी बोलताना कर्णधार रिषभ पंतलाही पाठिंबा व्यक्त केला. रिषभ पंत २०२२ मध्ये रुरकी इथं झालेल्या रस्ते अपघातानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. निकोलस पुरनलाही २०१५ साली त्रिनिदादमध्ये एका कार अपघातानंतर कठीण काळाचा सामना करावा लागला होता. एक डझन शस्त्रक्रियांनंतर निकोलस पुरन पुन्हा खेळायला लागला. (IPL 2025, Sanjiv Goenka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community