Veer Savarkar : आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत!

Veer Savarkar : दिवसेंदिवस एकाच खोलीत सावरकरांना डांबून ठेवण्यात येई. उन्हाची तिरीप येत नसे न वाऱ्याची झुळूक. सगळ्याच नैसर्गिक हक्कांना इथे मज्जाव होता. या अंधारकोठडीत सावरकरांच्या मदतीला धावली सगळ्या मानवनिर्मित भिंतींना भेदून आकाशात उड्डाण करणारी प्रतिभा! या प्रतिभादेवीची आराधना सावरकर करू लागले, त्यांना काव्य स्फुरू लागले.

170
Veer Savarkar : आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत!
Veer Savarkar : आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत!

पार्थ बावस्कर

मारिल रिपु जगति असा कवण जन्मला! ही आत्मशक्ती घेऊन सावरकरांना घालवायची होती आयुष्याच्या उत्तरार्धाची ५० वर्षे! (Veer Savarkar) जन्म एकच, तरीही जन्मठेपा मात्र दोन! नियतीचा खेळ किती क्रूर होता बघा. विजीगिषु मनोवृत्तीनेच सावरकरांनी अंदमानात येताना कुटुंबाचा निरोप घेतला होता, बायकोला सांगितलं होतं, चिमण्या कावळे करतात तसा संसार नाही आपला, आपल्या एखाद्या संसाराची राखरांगोळी झाली म्हणून दु;ख करत बसू नकोस, संकटांसाठी सिद्ध हो, या त्यागातून राष्ट्र घडेल, लोकं आपल्याला ओळखतील ते राष्ट्राला ‘सावरणारे सावरकर’ म्हणून!

जीवन-मृत्यूचा संघर्ष सावरकर आपल्या कोठडीतून पाहत

अंदमान निकोबार (Andaman Nicobar) हा भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचा ५७२ बेटांचा हा अतिशय मोलाचा द्वीपसमूह. १८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिश अधिकारी अंदमानात आले, आणि तिथे राहू लागले. भारतातील क्रूर कैद्यांसाठी अंदमान ही जागा अतिशय योग्य आहे असा विचार करून या कैद्यांसाठी मोठे कारागृह बांधावे या कल्पनेतून अंदमानच्या एका टेकडीवर सेल्युलर जेल बांधण्याला सुरुवात झाली.

(हेही वाचा – Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव पार पडला, सर्वाधिक बोली २.०१ कोटी रुपये)

जुलैच्या ४ तारखेला १९११ साली सावरकर पोर्ट ब्लेअरला (Port Blair) येऊन पोहोचले. सेल्युलर कारागृहाची ही दारे आता पुन्हा थेट ५० वर्षांनी उघडणार होती ! अंगाला २४ तास घाम फुटेल इतके दमट हवामान आणि त्यात आडदांड जनावरांना द्याव्यात अशा क्रूर शिक्षा आणि त्या शिक्षांचा सामना करायला सज्ज असलेले सावरकर ! सामना सुरू झाला! शरीर आणि मन दोन्ही भानावर राहणार नाहीत इतके कठोर श्रम या ११ वर्षांत सावरकरांच्या नशिबात होते. नारळाच्या सालांचा काथ्या कुटावा लागे, त्याच्यापासून दोर वळावे लागत, ते वळता वळता हाताच्या बोटांची त्वचा इतकी रुक्ष होई की त्यातून रक्त वाहू लागे. साधारण बैलांना कोलुला किंवा घाण्याला जुंपले जाते, इथे मात्र हा दिग्विजय करून आलेला साहित्यशेखर कोलुला जुंपला जात होता एखाद्या जनावरासारखा! दिवसभरात वरून आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाच्या साक्षीने दररोज तीस पौंड, म्हणजे किलोत मोजाल तर १३-१४ किलो तेल काढणे बंधनकारक असे. त्यात अपयशी झालात तर पाठीवर वेताचे आणि चाबकाचे फटके बसत. असे फटके मारतांना पाठीवर कुठलेही वस्त्र नसे, निर्वस्त्र पाठीवर फटके पडले की ती त्वचा पातळ होत असे आणि आठ दहा फटक्यांच्या नंतर त्यातून घळाघळा रक्त वाही ! दररोज असे रक्ताने माखलेले कैदी जीवाच्या आकांताने ओरडत, किंकाळत आणि रात्रभर सेल्युलरचा परिसर आशा आर्त आवाजाने शहारून जात असे.

New Project 3 1

सावरकर ज्या कोठडीत होते ती कोठडी नेमकी फाशीघरासमोर होती. म्हणजे दररोज तीन चार जण मारतांना त्यांना पहावे लागत. अंदमानातील सगळेच कैदी देशभक्त होते असेही नाही. काही अट्टल चोर, महाभयंकर खुनी होते, अशा वेळी, ते खुशीने जात नसत फाशीच्या तख्ताकडे ! त्यांना ओढत, खेचत आणावे लागे, मग ते ओरडत, रडत, जीवाची भीक मागत आणि हा सगळा जीवन-मृत्यूचा संघर्ष सावरकर आपल्या कोठडीतून पाहत. (Veer Savarkar)

…आणि सावरकर प्रतिभादेवीची आराधना करू लागले

दिवसाचे आठ आठ तास कोलू फिरवूनही सावरकर केवळ तीन-चार लीटरच तेल गाळू शकत. काही अट्टल गुन्हेगार सवयीचे झाल्यामुळे सहा-सात लिटर तेल गाळत. अशा वेळी बारी सावरकरांकडे येऊन त्यांना खिजवायचा, म्हणायचा, “तो कैदी पहा, कितीतरी तेल गाळतो, तुम्हाला तेवढही जमू नये? सावरकर तडक उत्तर द्यायचे, “मी अर्ध्या तासात कविता लिहून दाखवतो, त्या कैद्याला दिवसभरात चार ओळी तरी लिहिता येतील का?” बारी चरफडायचा, तो म्हणायचा मार्सेहून निसटला असाल, पण इथे तसा प्रयत्नही करू नका, मी इथला भगवान आहे, इथली पानेही माझ्या परवानगीने सळसळतात ! इथे ५० वर्षं काढायची आहे, विसरू नका! सावरकर अभिमानाने सांगायचे… पन्नास वर्ष! अरे ५० वर्षं तुझं सरकार या देशावर राज्य तरी चालवेल का?”

दिवसेंदिवस एकाच खोलीत सावरकरांना डांबून ठेवण्यात येई. उन्हाची तिरीप येत नसे न वाऱ्याची झुळूक. सगळ्याच नैसर्गिक हक्कांना इथे मज्जाव होता. या अंधारकोठडीत सावरकरांच्या मदतीला धावली सगळ्या मानवनिर्मित भिंतींना भेदून आकाशात उड्डाण करणारी प्रतिभा! या प्रतिभादेवीची आराधना सावरकर करू लागले, त्यांना काव्य स्फुरू लागले. महाकाव्य लिहिण्याचा संकल्प त्यांनी कितीतरी आधीच केला होता. आता त्यासाठी मोकळा वेळ मिळतोय तर का मागे राहायचं या भावनेतून घायपात्याच्या काट्यांची लेखणी करून आणि कोठडीच्या भिंतींचा कागद करून कमला (Kamala) काव्य साकारू लागले, अंदमानच्या अंधेरीत!

(हेही वाचा – Fake SBI Branch : आता बॅंकही डुप्लीकेट; तमिळनाडूमध्ये उघडकीस आले धक्कादायक कृत्य)

सावरकरांचे ‘ते’ शब्द खरे ठरले, चिरंजीव ठरले 

अंदमानातले बहुतांश कैदी अशिक्षित आहेत हे लक्षात येऊ लागल्यावर सावरकरांनी त्या कैद्यांना एकत्र करून त्यांचे शिकवणी वर्ग घ्यायला आरंभ केला. एक लहानसे ग्रंथालय सुरू केले. राजबंद्यांच्या हक्कांसाठी ते लढले आणि मुख्य म्हणजे हिंदूंच्या होणाऱ्या बाटवाबाटवीचा उद्योग सावरकरांनी पूर्ण बंद पाडला. इतके कष्ट उपसूनसुद्धा हा माणूस ना थकत होता, ना थांबत होता! दुर्दैवाचे दशावतार किती दिशांनी यावेत याला काही मर्यादा असावी ना! पण सावरकरांच्या बाबतीत नियतीसुद्धा नाराज होऊनच बसली होती. इकडे मात्र मुंबई विद्यापीठाने त्यांची बी.ए.ची पदवीच काढून घेतली होती. अंदमानच्या (Andaman) काळ काळकोठडीत असताना सावरकरांना मातृस्थानी असलेली त्यांची वाहिनी, जी त्यांच्यासाठी स्फूर्तीदात्री होती. तिच्या निधनाची वार्ता समजली. दु:खाचा डोंगर कोसळला. अंदमानच्याच कोठडीत त्यांना एक दिवस अचानक सामोर एक ओळखीची आकृती दिसू लागली आणि ते क्षणभर थबकले. आतापर्यंत कल्पनाच केली नव्हती असा धक्का होता तो. त्यांचे थोरले बंधू बाबाराव हेही याच कारागृहात होते. एकमेकांना पाहून दोघेही कळवळले. एकमेकांना म्हणाले, “तुही इथेच, अरे मी समजत होतो माझ्या माघारी तू देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढशील. आता आपल्या व्रताचं काय होईल रे! मातृभू मुक्त कशी होईल रे!”

इथले कैदी सकाळी जंगलात भाजीपाला आणायला जात आणि येताना पायाला जळवा चिटकवून येत. या जळवा त्यांचे रक्त पीत असत. अशा ५०-६० जळवा पायाला चिटकल्या की, जखमांमधून रक्त बाहेर येई. असे ओसंडणारे रक्त पाहून तरी किमान आजची कष्टाची कामे माफ होतील. इस्पितळात एखादा दिवस काढू; पण हे जीवघेणे कष्ट नको अशी स्थिती इथल्या कैद्यांची झालेली असे. जंगलातून आणलेल्या भाज्या शिजवणारे कैदी गुप्तरोगी किंवा महारोगी असत.  अशांचा घाम त्या भाजीत सांडत असे आणि अशी आमटी, भाजी येथल्या कैद्यांना, परिणामी त्यांच्यात राहणाऱ्या सावरकरांना खावी लागे. भाजी धुतलेली, निवडलेली नसल्यामुळे कधी कधी त्यात सापाचे, पालीचे तुकडे निघत. सामान्य माणूस इतक्या घाणीत, किळसवाण्या वातावरणात इथे कसा राहील? एकतर तो वेडा होईल किंवा स्वतःचे जीवन संपवायला निघेल; पण सावरकर कुठल्या मातीचे बनले होते कुणास ठाऊक? जिंकण्याची दावेदारी करत समोर साक्षात मृत्यू उभा होता; पण विनायक मात्र त्या मृत्युलाच आव्हान देत सवाल करत होता. पुन्हा पुन्हा म्हणत होता, ”मारिल रीपु जगति असा कवण जन्मला”! अंदमानात आत्मघात करायला निघालेल्या आपल्या सवंगड्यांना सावरकर नेहमी सांगायचे, “अजिबात आत्महत्या करू नका, एक दिवस असा येईल की तुमच्या त्यागाचे प्रतीक, शौर्याची कहाणी सांगत याच कारागृहाच्या बाहेर तुमचे पुतळे उभारले जातील आणि भारतातून लोकं तुमच्या दर्शनासाठी, अभिवादनासाठी इथे येतील.” सावरकर आणि या क्रांतिकारकांचे पुतळे आज सेल्युलर कारागृहाच्या समोर दिमाखात उभे आहेत. सावरकरांचे ‘ते’ शब्द खरे ठरले आहेत. चिरंजीव ठरले आहेत. नाही का! (Veer Savarkar)

(लेखक व्याख्याते आणि इतिहास अभ्यासक आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.