वीर सावरकर: शिवरायांचा निष्ठावंत मावळा

333
वीर सावरकर: शिवरायांचा निष्ठावंत मावळा
वीर सावरकर: शिवरायांचा निष्ठावंत मावळा

स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवचरित्राने क्रांतिकार्याला प्रेरणा दिली. वीर सावरकर स्वतः विषयी सांगताना म्हणतात, “मी सावरकर कुटुंबात जन्माला आलो असलो तरी श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य, विक्रमादित्य, शालिवाहन, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, गुरुगोविंद सिंग या आणि अशा वीर पुरुषांच्या वंशातला आहे.”

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे उद्गार आपल्या सर्वांना आपली राष्ट्रीय ओळख करून देण्यास पुरेसे आहेत. आपल्या राष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. वीर सावरकरांचा हाच विचार पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेमध्ये “माझ्या देशाच्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न करीन.” या एका वाक्याने अधोरेखित केला गेला आहे.

छत्रपती शिवरायांचे श्रेष्ठत्व नेमकेपणाने व्यक्त करताना वीर सावरकर हिंदू पदपादशाही या ग्रंथात लिहितात, “हिंदूंच्या राजकीय भाग्याला जी महत्त्वाची आणि विजयप्रवर्तक कलाटणी मिळाली तिचे श्रेय शिवाजी महाराज आणि त्यांचे अध्यात्मिक गुरु रामदास स्वामी यांनी आपल्या हिंदुजातीपुढे जे थोर अध्यात्मिक आणि राष्ट्रीय ध्येय ठेवले त्या ध्येयाला जितके आहे तितकेच त्यांनी समरक्षेत्रात उपयोगात आणलेल्या नवीन डावपेचाच्या युद्धपद्धतीला व शस्त्र साधनांना आहे. महाराष्ट्रधर्म ही हिंदू जातीच्या राष्ट्रीय जीवनाची मृतप्राय झालेली ज्योत प्रज्वलित करणारी एक नवीन शक्ती होती हे जितके सत्य आहे तितकेच महाराष्ट्र युद्धपद्धती त्याकाळी हिंदू लोकात प्रचलित असलेल्या युद्ध शास्त्रात क्रांती घडवणारी नवीन युद्धपद्धती होती हे खरे आहे.”

याच ग्रंथात वीर सावरकर पुढे लिहितात “ज्या युद्ध पद्धतीने मुसलमानी सत्तेला मराठ्यांपुढे तग धरणे अशक्य केले आणि अंतिम हिंदुशीर्षावर विजयकिरीट चढवला ती युद्ध पद्धती म्हणजे शत्रूला चुकवावयाची गनिमी काव्याची युद्धपद्धती होती.” (संदर्भ-समग्र सावरकर खंड तिसरा, हिंदू पदपादशाही, पृष्ठ २ आणि ३)

शिवरायांची युद्धनीती आणि शिवरायांचे ध्येय हाच वीर सावरकरांना सशस्त्र क्रांतीच्या मार्गावरून वाटचाल करताना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभासारखा वाटला. शिवरायांच्या काळात मुसलमानांची सत्ता हिंदूंना त्राही भगवान करून सोडत होती. या सत्ता नष्ट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसह शपथ घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळात ब्रिटिश सरकारने अनन्वित अत्याचार केले. देशाची आर्थिक लूट केली.

आपली परमप्रिय भारतमाता पुन्हा परकीय सत्तेच्या टाचेखाली घुसमटताना वीर सावरकरांनी पाहिली. शिवरायांप्रमाणेच आपणही आपल्या भारतमातेच्या मुक्ततेसाठी सशस्त्र लढा दिला पाहिजे, ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव वीर सावरकरांना बालवयातच झाली. शिवरायांनी इस्लामिक सत्ता नष्ट करण्यासाठी शिव शंकराला साक्षी ठेवून शपथ घेतली होती. त्यावेळी शिवराय केवळ पंधरा वर्षांचे होते. वीर सावरकरांनी सुद्धा घरातल्या अष्टभुजा देवी समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी शपथ घेतली. त्यावेळी वीर सावरकर पंधरा वर्षांचे होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही शपथ घेताना वीर सावरकर म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रक्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेपर्यंत झुंजेन. यशस्वी झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे भारतमातेच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा दैदिप्यमान मुकुट चढवेन! अपयशी ठरलो तर चापेकर बंधूंप्रमाणे हसत हसत फासावर जाईन.”

शिवचरित्राने केवळ वीर सावरकरांना प्रेरणा दिली असे म्हणता येणार नाही. वीर सावरकरांच्याही आधी अनेक राष्ट्रभक्तांना शिवचरित्राने प्रेरणा दिलेली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी शिवरायांचे चरित्र बंगालमधल्या बांधवांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करण्यास उपयुक्त ठरेल म्हणून बंगाली भाषेत उपलब्ध करून दिले. योगी अरविंद यांना शिवरायांमध्ये जगदंबेचे तेज आढळले. वासुदेव बळवंत फडके यांनी छत्रपती शिवरायांप्रमाणेच आपल्या समाजातल्या बांधवांना आपल्या समवेत घेऊन सशस्त्र क्रांती दल निर्माण केले. पारतंत्र्यातल्या अंध:कारात स्वातंत्र्याचा वेध घेण्यासाठी संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देणारा शिवराय हा एकमेव राष्ट्रपुरुष आहे याची जाणीव लोकमान्य टिळकांना झाली. म्हणून त्यांनी शिवजयंती उत्सवाचा घाट घातला.

लोकमान्य टिळकांच्या या प्रयत्नाला सक्रिय दाद देताना दामोदरपंत चापेकर म्हणाले,
नाही होत स्वतंत्रता शिव कथा,
घोटून भाटापरी ।
घ्यावे लागतातसे शिवाजी बाजी परी हे,
मस्त स्वहस्तावरी ।
हे जाणूनी तुम्ही आता स्वजन हो,
घ्या खड्ग ढाल हाती ।
मरा थाप भुजावरी अरी शिरे,
तोडू असंख्यात ती ।।
असे म्हणून चापेकर बंधूंनी भारत मातेच्या मुक्ततेसाठी बलिदान दिले.

या सर्वांप्रमाणेच वीर सावरकरांवरही शिवचरित्राची छाप पडली. शिवरायांनीच सावरकरांना प्रेरणा दिली. शिवरायांनी मी या देशाचा आणि हा देश माझा आहे ही भावना आपल्या बांधवांच्या मनात निर्माण केली. राष्ट्रकार्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट सहजतेने बाजूला सारण्याची प्रेरणा शिवरायांनीच आपल्या मावळ्यांना दिली. म्हणूनच तान्हाजी शिवरायांना सहजतेने म्हणाला, “आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.” मुलाच्या लग्नापेक्षा राष्ट्राच्या मुक्ततेसाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी कोंढाणा जिंकणे अधिक श्रेष्ठ आणि महत्त्वाचे कार्य आहे याची जाणीव प्रत्येक मावळ्याला होती. कौटुंबिक सोहळ्यापेक्षा राष्ट्रीय सोहळा अधिक महत्त्वाचा याची जाणीव शिवरायांच्या काळातल्या प्रत्येक नागरिकाला होती.

शिवचरित्रातल्या या आणि अशा अनेक घटना वीर सावरकरांना प्रेरित करत होत्या. म्हणूनच वीर सावरकर बंधूंनी सुद्धा कौटुंबिक जीवनापेक्षा राष्ट्रीय जीवनाला प्राधान्य दिले. स्वातंत्र्य समराच्या यज्ञकुंडात आपली ही समिधा पडली पाहिजे आणि हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड सतत धगधगत ठेवला पाहिजे म्हणून संपूर्ण वीर सावरकर कुटुंब भारतमातेच्या चरणी समर्पित झाले. ते केवळ शिवरायांच्या प्रेरणेमुळे.

हिंदुपदपादशाही या ग्रंथात राष्ट्रासाठी नागरिकांची काय भावना असली पाहिजे हे सांगताना वीर सावरकर लिहितात, “परकीय राज्यकर्त्याकडून पाठ थोपटून घेणारा आणि हांजी हांजी करणारा त्यांचा सेवक व्हायचे नाही हे निश्चित. इतर सहाय्याला येवोत न येवोत; आपण तरी सर्वस्वावर पाणी सोडून आपल्या पूर्वजांच्या अस्थींचे आणि देवतांच्या देवळांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करायचा, युद्धे भांडायची आणि प्रसंगी आपल्यापेक्षा बलिष्ठ शत्रूशी लढता लढता मरायचे. त्यात यश मिळवण्याचे आपल्या दैवी (नशिबात) असेल आणि मरण न येता समर भूमीवर विजयश्री आपल्याला माळ घालणार असली तर विक्रमादित्य किंवा शालिवाहनाप्रमाणेच आपल्यालाही आज कित्येक पिढ्यांना पडलेली स्वप्ने ज्यात संस्मरणीय रीतीने पूर्ण झालेली दिसतील अशा आणि जे मिळवण्यासाठी आपल्या धर्माच्या साधूंनी आणि संतांनी आजपर्यंत आशायुक्त अंत:करणांनी देवाला आळवले अशा, हिंदूंच्या एका श्रेष्ठ आणि वैभवशाली साम्राज्याचा पाया घालण्याचे श्रेय आपल्याला लाभेल!”

या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे वीर सावरकर तशा प्रकारचे जीवन जगले. त्यांनीही असेच ठणकावून सांगितले, “याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोध कराल तर तुमच्या विरोधाला न जुमानता आम्ही आमचा देश स्वतंत्र करू.”

एका तरुणाने क्रांतीयुद्धाची उठावणी केली. १६४५ मध्ये शिवरायांनी आपल्या एका सवंगड्याला एक पत्र पाठवले. शिवरायांचा हा सवंगडी विजापूरच्या शहाच्या विरोधात लढला होता. त्याचे एक कृत्य म्हणजे त्याच्याकडून घडलेले राजद्रोहाचे पातक आहे असा त्याच्यावर आरोप केला. त्या आपल्या सवंगड्याला शिवराय पत्र लिहून कळवतात, “जर कोणाशी एकनिष्ठ राहायला आपण बांधले गेलो असलो तर ते कोणा शहाला किंवा बादशाहाला नाही. आपली बांधिलकी परमेश्वराशी आहे.” असे सांगून शिवरायांनी उच्च नीतिमत्तेची भावना आपल्या सवंगड्यांमध्ये जागृत केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ शिवरायांनी घेतली असली तरी ती भगवंताची इच्छा आहे असे शिवरायांनी मानले.

हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी परकीय मुसलमानी सत्तेला उलथून पाडण्यासाठी, स्वतंत्र आणि समर्थ असे हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांनी अमूलाग्र हिंदू चळवळ केली. शिवरायांची ही चळवळ सावरकरांना अखंड हिंदुस्तान स्थापन करण्यासाठी प्रेरणा देत होती हे विसरून चालणार नाही. म्हणूनच सावरकर कोणत्याही यादवीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होते.

शिवरायांनी आपल्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली दास्य वृत्ती आणि त्यामुळे निर्माण झालेली दुर्बळ मने सुदृढ आणि बलवान करण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हर हर महादेव अशी वीर गर्जना केली.

शिवचरित्र सर्वांना आकर्षित करणारे का आहे? याचे कारण सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू पदपादशाही या ग्रंथात लिहितात, “शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे खरे मोठेपण हेच आहे की त्यांनी चालू केलेली चळवळ त्यांच्या नंतर दीर्घकाळ टिकली. एवढेच नाही तर त्यांच्याच सारख्या समर्थ आणि देशभक्त विभूती शतावरी संघटनापटूंची आणि रण धुरंधरांची, वीरांची, हुतात्म्यांची एकामागून एक अखंड परंपरा निर्माण झाली. या परंपरेने त्याच पवित्र कार्याप्रित्यर्थ घनघोर लढाया लढल्या. राष्ट्राला हिंदू पदपादशाहीच्या ध्येयाकडे नेले. जे वैभव पाहून प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करवला तेव्हा त्यांच्या हातात एक पुरा प्रांत सुद्धा नव्हता. पण जेव्हा त्यांच्या अनुयायाने राघोबा दादाच्या अधिपत्याखाली थेट लाहोर मध्ये प्रवेश केला आणि मराठी घोडा सिंधू नदीच्या तीरावर विजय भराऱ्या मारु लागला. तेव्हा एक संपूर्ण खंड त्यांच्या चरणाशी लोळू लागला. त्यांचे ते कार्य महान आणि अधिक पूर्ण होते. शिवाजी महाराजांना मृत्यूने गाठले पण इकडे औरंगजेब जिवंत होता. तरीही त्याला महाराष्ट्राची तसूभर भूमी जिवंत असेपर्यंत जिंकता आली नाही. औरंगजेबाला आणि त्याच्या अहिंदू महत्त्वाकांक्षांना अहमदनगरच्या एका सामान्य थडग्यात अंतिम मूठ माती मिळाली ती शिवाजी महाराजांनी नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्राने दिली. रायगडावर पेरलेल्या स्वराज्य स्थापनेच्या बीजाचे रूपांतर मराठी साम्राज्याच्या प्रचंड वृक्षात झाले.”

शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नंतरच्या वीर मराठ्यांनी त्याचे हिंदू साम्राज्यात परिवर्तन केले. या दोन घटनांना जोडणारी घटना म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर शिवरायांच्या मृत्यूकडे पाहतात.

श्रीराम आणि श्रीकृष्णाने त्यांच्या काळातला शत्रू मारला. त्याच्यावर विजय संपादन करून न्यायाचे, नैतिकतेचे, सत्याचे राज्य प्रस्थापित केले. आर्य चाणक्य यांनी त्यांच्या काळातल्या शत्रूचा पराभव करून हिंदुस्थानची भूमी सुरक्षित ठेवली. विक्रमादित्य, शालिवाहन यासारख्या राज्यांनी परकीय आक्रमकांना नष्ट करून आपल्या भू सीमा सुरक्षित ठेवल्या. शिवरायांनी त्यांच्या काळातल्या इस्लामिक सत्तांना आपल्या टाचेखाली दाबून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा हा शौर्याचा पराक्रमाचा वारसा आपणच शौर्याने, पराक्रमाने जतन करायला हवा. या जाणिवेने प्रेरित होऊन ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची संघटना उभारली. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेने ब्रिटिश सरकारची झोप उडवली.

वीर सावरकरांना असंख्य सहकारी लाभले. जे शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणेच शूरवीर योद्धे होते. अनेकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या. हसत हसत फासावर चढून आपले बलिदान दिले.

स्वतःला राज्याभिषेक करून घेताना शिवरायांना आपल्या सवंगड्यांचे स्मरण झाले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता अखंड शिवाजी महाराजांच्या अंतकरणांमध्ये नंदादीपासारखी तेवत होती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातही आपल्या सहकाऱ्यांविषयीची कृतज्ञतेची भावना सदैव जागी होती. म्हणूनच सांगता समारंभाच्या वेळी भाषण करताना वीर सावरकर म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी घेतलेली शपथ देश स्वतंत्र झाल्यामुळे आता पूर्णत्वास गेली आहे. त्या शपथेची सांगता करणे क्रमप्राप्त आहे. जिवंत असलेल्या क्रांतिकारकांचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्यासमोर उभा आहे. ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे प्रतिनिधित्व करणारा क्रांतिकारक म्हणून आजच्या सांगता समारंभाचे अध्यक्ष पद सुभाष बाबूंना मी देऊ इच्छितो. म्हणूनच त्यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली आहे.”

वीर सावरकर राष्ट्राच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील होते. ज्या ज्या थोर पुरुषांनी आपल्या देशासाठी, संस्कृतीसाठी, धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्या सर्वांविषयी कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून सावरकरांनी राष्ट्रकार्य केले. हे राष्ट्रकार्य करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत याचे विस्मरण त्यांनी होऊ दिले नाही.

वीर सावरकरांची राजनीती ही शिवरायांच्या पदचिन्हांचा मागोवा घेत मार्गक्रमण करत होती याची आपल्याला वेळोवेळी प्रचिती येते. शत्रूची अडचण, शत्रूवर आलेले संकट हीच आपल्यासाठी असलेली विजयाची पर्वणी आहे हे शिवरायांच्या युद्धनीतीचे सूत्र वीर सावरकरांनी आत्मसात केले होते. म्हणूनच दुसरे महायुद्ध जवळ येऊन ठेपले असताना वीर सावरकरांनी आपल्या देशातल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यास सांगितले. त्याचा योग्य तो उपयोग देश स्वतंत्र करण्यासाठी झाला. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या सैनिकांनीच संकटात सापडलेल्या ब्रिटिश सरकारला कोंडीत पकडले आणि देश स्वतंत्र केला. सावरकरांची ही रणनीती शिवरायांच्या युद्धनीतीचे स्मरण करून देण्यास पुरेशी आहे.

श्रीराम आणि श्रीकृष्ण शिवाजी महाराजांची प्रमुख दैवते होती. शिवाजी महाराजांनी शत्रूला दिलेले वचन पाळले नाही, शत्रूला दिलेला शब्द पाळला नाही. हे करताना शिवरायां समोर श्रीकृष्णाचा आदर्श होता. श्रीकृष्णाने अधर्माचे उच्चाटन करून धर्माची प्रस्थापना करण्यासाठी, अन्यायाला नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि अनैतिकतेला मूठमाती देऊन नैतिकतेची पायाभरणी करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. या कार्याच्या आड येणारे वचन, या कार्याच्या आड येणारी प्रतिज्ञा श्रीकृष्णाने बेलाशक धुडकावून लावली. श्रीकृष्णाची ही शिकवण छत्रपती शिवरायांनी तंतोतंत आपल्या आयुष्यात उतरवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा सशस्त्र क्रांतीचा लढा लढत असताना शिवरायांचा हा मंत्र आपल्या उराशी जपला. देश स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट सावरकरांनी लाथाडली आहे. देशाचे स्वातंत्र्य हे सर्वोच्च ध्येय आहे. ते ध्येय गाठण्यासाठी वचने द्यायची असतात पण ते वचन पाळणे, ती शपथ पाळणे जर स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयाच्या आड येत असेल तर तिला मूठ माती देणे हीच राष्ट्रनिष्ठा आहे. त्यामुळे अशी वचने धुडकावून लावणे हेच पुण्य कर्म आहे. सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात तेच केले. म्हणून सावरकरांना कधीही दोष देता येणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे.

वीर सावरकरांचे आणि छत्रपती शिवरायांचे चरित्र पाहिले तर आपल्याला निश्चितपणे असे अनुमान काढता येते की, स्वातंत्र्यवीर सावरकर हा छत्रपती शिवरायांचा निष्ठावान मावळा आहे.

– दुर्गेश जयवंत परुळकर
(व्याख्याते आणि लेखक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.