संस्कृतीद्रोही शिवराज पाटील

86

भारतीय संस्कृती ही जगातली सर्वोत्तम संस्कृती आहे. याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशातल्या अनेक राजकीय नेत्यांना त्याचे भान राहिले नाही. भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास शून्य आहे. त्यांचा जन्म या भूमीत झाला असला तरी त्यांना भारतीय संस्कृतीचे नेमके ज्ञान झाले नाही. त्यांची बुद्धी विकृत पद्धतीने विकसित झाली आहे का, अशी शंका त्यांनी केलेल्या विधानामुळे येते. असे विधान ज्यावेळी कोणी करतो त्यावेळी संस्कारांचे महत्त्व त्यांना ठाऊक नाही हाच त्यांचा सर्वात मोठा दोष आहे. असे अनुमान कोणी काढले तर त्याला दोष देता येणार नाही.

जिहादासाठी क्रौर्याची परिसीमा

भगवद्गीता हा जगातला सर्वोत्तम मार्गदर्शक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला ग्रंथ आहे.‌ अशा ग्रंथाशी अन्य कोणत्याही धर्मग्रंथाशी तुलना करता येणार नाही. मुसलमानांमध्ये असलेली जिहादची कल्पना भारतातील कोणत्याही धार्मिक ग्रंथात काय पण कोणत्याही अन्य ग्रंथात सुद्धा आढळत नाही.‌ इस्लामेतर धर्मियांच्या राज्याचे, राष्ट्राचे, देशाचे रूपांतर इस्लामिक राष्ट्रात करण्यासाठी केलेले युद्ध म्हणजे जिहाद! हा जिहाद करताना क्रौर्याची परिसीमा गाठण्याची मुभा यात देण्यात आली आहे.

(हेही वाचाः ‘इतिहासाची मोडतोड कराल तर गाठ माझ्याशी आहे’, संभाजीराजे छत्रपती यांचा थेट इशारा)

धर्मयुद्धाचा सिद्धांत

श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्मयुद्ध करण्यासाठी सांगितले. न्याय, नीतीला मानवतेला अनुसरून अन्यायावर विजय मिळवणे याला धर्मयुद्ध म्हणतात.‌ अन्याय करणे म्हणजेच अमानवीय वर्तन करणे होय. अशा अमानवीय वर्तन करणाऱ्याला देहदंडाचे शासन करणे किंवा अशा प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध युद्ध करणे हाच न्याय, हीच नीती आणि हीच मानवता होय. जिहादमध्ये अशा प्रकाराचा सिद्धांत सांगण्यात आला नाही. जिहाद करताना अन्याय, अत्याचार, अनैतिकता, अमानवीयता, बलात्कार, लुटालुट, जाळपोळ, या सर्व गोष्टी करण्यासाठी पूर्ण मुभा देण्यात आली आहे.

राजकीय नेत्यांना भान नाही

गीतेविषयी कोणताही अभ्यास नसताना शिवराज पाटील यांनी काढलेले उद्गार संतापजनक आहेत. गीतेची तुलना कुराणशी करुन त्यांनी श्रीकृष्णाचा, भारतीय संस्कृतीचा अपमान केला आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास न करता केलेले विधान हे विद्वत्तेचे लक्षण नाही. अशा विधानातून भारतीय संस्कृतीच्या विद्वेषाचा दर्प येतो. आचार, विचार स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ते करताना सारासार विवेक बाळगायचा असतो. पण त्याचे भान राजकीय नेत्यांना राहिले नाही. जगातल्या कोणत्याही सभ्य सुशिक्षित सुसंस्कृत माणसाने गीतेची तुलना कुराणशी केलेली नाही.

(हेही वाचाः …म्हणून शिवराज पाटील यांनी माफी मागितली पाहिजे, बावनकुळेंची मागणी)

इंदिरा गांधींचे उद्गार

ज्या काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व शिवराज पाटील यांनी स्वीकारले आहे, त्यांना कदाचित हे माहीतही नाही की १९७१ मध्ये बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध केले. त्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यानंतर संसदेत भाषण करताना इंदिरा गांधींनी पुढील अर्थाचे उद्गार काढले… ‘या युद्धात आपण विजय संपादन करू शकलो ते भगवद्गीतेमुळे! एवढेच नव्हे तर त्यांनी भगवद्गीतेची प्रत त्या वेळचे संरक्षण मंत्री जगजीवन राम यांना देऊन त्यांचा सत्कार केला.’

शिवराज पाटील यांचे डोके ठिकाणावर आहे का?

आपल्या नेत्यांची गीतेविषयीची भावना जो माणूस ओळखू शकत नाही त्याला भगवद्गीतेसारख्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचे आकलन झाले नाही हेच यावरून सिद्ध होते. नरकासुराने सहस्रावधी स्त्रियांना पकडून स्वतःच्या राज्यात नेले होते. त्या स्त्रियांची सुटका करण्यासाठी श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण केले, त्याला ठार मारले. त्यांनी पळवून नेलेल्या सहस्त्रावधी स्त्रियांची सुटका केली. त्यांचा पित्याप्रमाणे प्रतिपाळ केला. असा श्रीकृष्ण जिहादचे शिक्षण अर्जुनाला देतो असे म्हणणाऱ्या शिवराज पाटील यांचे डोके ठिकाणावर आहे का?

(हेही वाचाः रवी राणा हे कोणासाठी काम करतात?)

परस्त्री मातेसमान ही हिंदू संस्कृतीची शिकवण

जिहादी लोक परस्त्रीयांवर बलात्कार करतात. अनेक इस्लामिक आक्रमकांनी शत्रूच्या पळवून आणलेल्या स्त्रिया आपल्या जनानखान्यात ठेवल्या होत्या. असला हिडीसपणा आणि विकृती जिहादमध्ये आहे. परस्त्री मातेसमान आहे ही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. म्हणूनच अन्यायाला परस्त करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या धर्मयुद्धात अशी शिकवण आढळत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याचा दिलेला सल्ला म्हणजे जिहाद नाही. शिवराज पाटील यांनी गीतेचा अभ्यास न करताच विधान केले आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी अभ्यासोनी प्रकटावे असे म्हटले ते यासाठीच!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.