इंदोर-अमळनेर MSRTC बस अपघाताबाबत मोदी, शिंदे, फडणवीसांनी व्यक्त केला शोक

122

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस सोमवारी सकाळी 10 वाजता नर्मदा नदीत कोसळली. या भीषण एसटी बस अपघातावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत या बस दुर्घटनेची घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून, स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्टटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले एसटी महामंडळाला निर्देश

अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर तातडीने उपचारासाठी मध्य प्रदेशच्या जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी संवाद साधून खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली. तसेच अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली 

दरम्यान, ट्वीटर द्वारे फडणवीस म्हणाले, ” इंदोर-अमळनेर ही बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो. हिंगणघाट येथे अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. वर्धा जिल्हाधिकारी यांच्याशी मी चर्चा केली आहे. एसडीआरएफ टीम तेथे पोहोचली असून एनडीआरएफ ची टीम सुद्धा रवाना झाली आहे. ” असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.