G-20 Summit : गोपालनाद्वारे यशस्वी सेंद्रीय शेती करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशकथा जी 20 परिषदेत गाजणार

89
G-20 Summit : गोपालनाद्वारे यशस्वी सेंद्रीय शेती करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशकथा जी 20 परिषदेत गाजणार
G-20 Summit : गोपालनाद्वारे यशस्वी सेंद्रीय शेती करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशकथा जी 20 परिषदेत गाजणार

निमगाव (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील जगन्नाथ मगर यांची यशकथा जी-२० शिखर (G-20 Summit) परिषदेत गाजणार आहे. जगन्नाथ मगर यांची निमगावात १५ एकर शेती आहे. त्यांनी शेतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मूलभूत प्रयत्न केले. सुरुवातीपासून त्यांनी शेतात रासायनिक खते व कीटकनाशक बंद केले. त्यानंतर गोपालन करत गाईचे शेण व गोमुत्राचा वापर करत जमिनीच्या सुपीकतेसाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नाने जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे पाणी वापरात लक्षणीय काटकसर करता आली. त्यांनी गाईसोबत मेंढ्या, शेळ्या व म्हशीचे पालन केले. त्यातून त्यांनी वर्षभर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून घेतले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना आलेल्या यशाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.  केंद्राच्या वतीने जी-२० शिखर परिषदेत विदेशातील पाहुण्यांना भारतीय नैसर्गिक शेतीबद्दलची त्यांची यशकथा सादर केली जाणार आहे. यापूर्वी आयसीएआरकडून (इंडियन कॉउन्सील ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च) त्यांना शेतीविषयक विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय परिषदेत त्यांना निमंत्रित केले होते.

(हेही वाचा – Shiv Sena : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : १४ सप्टेंबरपासून सुनावणी, ५४ आमदारांना नोटीस)

‘जगन्नाथ मगर हे तेजपूर (आसाम) विद्यापीठात झालेल्या सेंद्रिय उत्पादकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांची निवड इंडियन नॉलेज सिस्टमअंतर्गत आम्ही निवड केली. त्यामध्ये जगन्नाथ मगर यांच्या शेतीप्रयोगाची चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत जी-२० च्या संबंधित चमूकडे पाठवली गेली आहे’, असे पुणे येथील आयकेएसचे  प्रॉडक्शन मॅनेजर विजयकुमार चौरासिया यांनी सांगितले. (G-20 Summit)

जगन्नाथ मगर यांनी तुतीची लागवड करून रेशीम कोशाची निर्मिती केली. ही लागवड केल्यानंतर त्यांना केवळ १५ च्या ऐवजी १३ फिडींगमध्ये कोश मिळू लागले. तसेच कोशाच्या धाग्याची गुणवत्ता वाढल्याने कोशालाही दर वाढून मिळाले.उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना त्यांनी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले. सेंद्रिय शेती करताना केवळ ती उत्पादन गुणवत्ता बदलणारी नसावी तर उत्पादनाचे विक्रम नोंदविणारी असावी हे त्यांनी विविध पिकांच्या प्रयोगातून सिद्ध केले. त्यांनी स्वतःचे घर बांधले तर त्याला शेणापासून निर्मित प्लास्टर केले. त्यामुळे घराच्या तापमानातील फरक प्रत्येकाला अनुभवता येतो.

‘मागील काही वर्षापासून विषमुक्त शेतीचा प्रयोग करत असताना रासायनिक खताच्या खर्चात झालेली बचत हा नफा गृहीत धरला पाहिजे. तसेच वाढीव भाव देखील हमखास मिळतो. शेती हे काम म्हणून नव्हे तर छंद समजून केले तर अनेक प्रयोग यशस्वी करता येतात’, असे जगन्नाथ मगर सांगतात. (G-20 Summit)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.