लॉकडाऊनची तयारी… १४ एप्रिलनंतर होणार निर्णय?

93

राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. त्याची पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससोबत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समधील तज्ज्ञ लॉकडाऊनच्या बाजूने असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवस अर्थ विभाग आणि अन्य विभागांशी चर्चा करणार असल्याचे समजत आहे. लॉकडाऊन लावताना गरीब वर्गाला कशा पद्धतीने मदत करता येईल यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १४ एप्रिल नंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन समजते.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्यांवर टास्क फोर्ससोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत विस्तृत चर्चा झाली. या दृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कडक निर्बंध लावावेच लागतील

आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र, आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एसओपी तयार करणे सुरू

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली. लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरुकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पीक-अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसताना धोका निर्माण झाला असून, लॉकडाऊन लाऊन ही वाढ थोपवावी, असे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडेसिवीरचा अवाजवी वापर थांबवण्यावर चर्चा  

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागवण्याची कार्यवाही करावी, यावरही बैठकीत चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अती व अवाजवी वापर थांबवणे देखील गरजेचे आहे, असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे,  रेमडेसिवीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरुन घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढवणे यावर कार्यवाही झाली आहे, अशी माहिती दिली.

(हेही वाचाः रेमडेसिवीरसाठीची धावपळ संपणार… काय आहेत राज्य शासनाच्या सूचना?)

टास्क फोर्सने दिल्या सूचना

  • ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रितीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरुपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी.
  • सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करुन तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी.
  • मुंबई महापालिकेप्रमाणे वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून, बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे.
  • डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाची ६ मिनिटे वॉक टेस्ट करुन घ्यावी मगच निर्णय घ्यावेत.
  • तरुण रुग्णांना देखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे.
  • ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त दिला जाऊ नये यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे.
  • मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे.
  • एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करुन घेणे.

अशा सूचना टास्क फोर्समधील तज्ज्ञांकडून करण्यात आल्या आहेत.

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून, पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करुन ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल, त्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही कुंटे यांनी सांगितले.

(हेही वाचाः रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना ‘टोचले’!)

अशी आहे कोरोना रुग्णांची आकडेवारी

डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १ हजार ९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढत आहे. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करत आहोत, तितका हा दर वाढत आहे. १० एप्रिलला आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख अॅन्टिजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून, ६७ हजार ऑक्सिजन बेड्सपैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यांत बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करुन, रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे, असेही व्यास म्हणाले.

यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाइन बैठक घेतली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.