प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी वापरल्यास होणार कायदेशीर कारवाई

86

महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, वाहतूक, विक्री, साठवणूक, हाताळणी व वापरास पूर्णपणे बंदी आहे.त्यामुळे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर कोणीही करु नये, अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – भाजप कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी आक्रमक; तुटपुंजी मदतही मिळालेली नाही, चंद्रकांत पाटीलांचा निशाणा)

संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिकवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) बंदी घातलेली आहे. या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या); प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरुन टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू जसे की ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू; द्रव्य पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप / पाऊच; सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन यांचा समावेश होतो.

महापालिकेने केले नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे उपरोक्त नमूद केलेल्या प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) करु नये. या अधिसुचनेचे उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्‍ह्यासाठी रुपये ५,०००/-, दुसऱया गुन्‍ह्यासाठी रुपये १०,०००/- आणि त्यानंतरच्या गुन्‍ह्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व रुपये २५,०००/- पर्यंत दंड वसूल करण्यात येईल. सर्व संबंधितांनी कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.