लोकशाहीने चालणार्‍या भारताचा विनाश करणं हाच डाव्यांचा कार्यक्रम, प्रवीण दीक्षित यांचे मत

82

चुकीचा, फसवा इतिहास सांगून, खोटी माहिती पसरवून समाजात हिंसाचाराची बिजे पसरवणाऱ्या डाव्या प्रवृत्तींचा घातक चेहरा समाजाने समजून घ्यावा लागेल. यासह लोकशाहीने वाटचाल करणाऱ्या भारताचा विनाश आणि चीनच्या धोरणांना पाठिंबा देत भारताला विरोध हाच डाव्यांचा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात दीक्षित बोलत होते. विवेक विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा

शेतकरी, कामागार, दलित, अल्पसंख्य व गरिबांच्या नावाने व त्यांच्या खर्‍या खोट्या मागण्यांचे आपणच प्रवक्ते आहोत असा कांगावा करत खरा चेहरा लपवायचा व हिंसाचाार करायचा ही डाव्यांची वस्तुस्थिती आहे. प. बंगाल, त्रिपुरा व केरळ या राज्यांचा त्यासाठी त्यांनी प्रयोग शाळा म्हणून वापर केला. नक्षलवाद हा डाव्यांचा विघटनवादी उग्र चेहरा आहे. विश्वासघात हाच त्यांचा उद्योग आहे. डाव्यांच्या भ्रष्टाचाराचे वास्तव, विरोधाचे केवळ ढोंग, बौद्धिक क्षेत्रातही भ्रष्टाचार यावर ही लेखकाने प्रकाश टाकल्याचे प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

(हेही वाचा – कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मनसे’तर्फे ST च्या ‘शिवशाही’ एसी बसची FREE सेवा!)

लोकशाहीने चालणार्‍या भारताचा विनाश करणे व खुद्द चीनमधेही तिथल्या सत्ताधार्‍य़ांनी नाकारलेल्याा माओवादाच्या नावाखाली सर्वंकश सत्ता हस्तगत करणे हे भारतीय डाव्यांचे उद्देश आहे. हे नीट समजून घेऊन जनतेने ते नाकारणे आवश्यक आाहे, हे सगळ्यांना समजावून सांगण्याचे आवाहन लेखकाने केलेले आहे व ते अगदी योग्य असल्याचे दीक्षित यांनी म्हटले आहे. तसेच आंतर्राष्ट्रीय स्तरावर भारत विरोधी भूमिका घ्यायची, चीनची बाजू घेऊन भारतावर टीका करायची, स्वतःला कम्युनिस्ट न म्हणता डावे म्हणायचे, काँग्रेसमधे घुसायचे व काँग्रेसही त्यांना सामील करून घेत होती, कारण तेही या आंतर्राष्ट्रीय व्यवस्थेचे लाभार्थी होते व हाच डाव्यांचा खरा चेहरा आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे.

दलित, आदिवासी महिला हे नक्षल्यांचे लक्ष्य

युरोपमधे 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली व यंत्रांच्या सहाय्याने वस्तू बनवायला सुरूवात झाली. त्याबरोबर मालक व कामगार असे दोन वर्ग निर्माण झाले. मालक कामगारांचे कायम शोषण करतात, जमीनदार भूमीहीन मजुरांची पिळवणूक करतात, श्रीमंत गरीबांना नाडतात, असे तत्वज्ञान मार्क्स ने मांडले. प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये मार्क्सचा विशेष परिणाम झाला नाही, परंतु रशियातील लेनिननी त्याच्यापासून प्रेरणा घेतली व तिथे लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेजवळ पोहोचून लोकशाही संपवली व कम्युनिस्टांची सत्ता स्थापना केली. लेनिननंतर स्टॅलीनपासून गोर्बाचेव पर्यंत कम्युनस्टांची सत्ता चालू राहिली. मध्यंतरी चीनमध्ये माओने सत्ता काबीज केली व तिथेही त्याच्यापद्धतीची कम्युनिस्ट राजवट सुरु केली. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक भारतीय तरुण शिकायला केंब्रिज विद्यापीठात गेले व कम्युनिस्ट होऊन परत आले. प्रशासकीय सेवेत काम करताना लोकांच्या विरोधी धोरणे करण्यात त्यांनी धन्यता मानली. बस्तर या वनवासी जिह्यात बाहेरच्यांना जायला मनाई असली, तरी मिशनऱ्यांना मुक्तद्वार होते. दलित आणि आदिवासी महिला हे नक्षल्यांचे लक्ष्य आहे. हिंसक मार्गाने सत्ता परिवर्तन घडवून आणायचे हेच डाव्यांचे धोरण आहे, असे म्हणत भंडारी यांनी लेखनामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

समाजात धार्मिक संघर्ष पसरवणे डाव्यांचे कार्य

अनेक उदाहरणे देऊन लेखक पटवून देतात की, भ्रष्टाचार हाच डाव्यांचा शिष्टाचार होता. केवळ राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक, ऐतिहासिक, प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातही अप्रामाणिकपणा हे डाव्यांच्या वागण्याचे वैशिष्ट्य आहे. चुकीचा इतिहास पसरवून देशात, समाजात धार्मिक संघर्ष पसरवणे डावे करत होते. केवळ सामान्य वाचकांनीच नव्हे तर सर्व राजकारणी लोकांनी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे, असे दीक्षित यांनी आग्रहाने सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.