शिवशाहिरांचे निर्वाण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आठवडाभरापासून दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.

77

घरात पाय घसरून पडल्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांची प्राणज्योत सोमवारी, १५ नोव्हेंबर रोजी वयाच्या १०० व्या वर्षी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे ५ वाजून ७ मिनिटाने मालवली. त्यांच्या पार्थिवावर सकाळी १०.३० मिनिटांनी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी श्रावण मासात झाला. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते अशी ओळख असलेल्या बाबासाहेबांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये.

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधन

पुण्यातच स्थायिक झाले असताना बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.

५ लाख घरात पोहचला राजा शिवछत्रपती ग्रंथ

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

(हेही वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक)

ऐतिहासिक ‘जाणता राजा’ नाटक साकारले

याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. ’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १० दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात. महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशांतही त्यांच्या व्याख्यानांतून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते. हे चरित्र व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आजपर्यंत बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली.

महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार

बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली. राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते. अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या साऱ्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले.

पुरस्काराने सन्मान

  • डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाकडून डी.लिट. (२०१३)
  • महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान
  • गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार
  • पद्मविभूषण पुरस्काराने गौरव
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.