Israel-Palestine conflict : इस्रायलकडून भारताने काय शिकावे ?

इस्रायलमध्ये गेल्या २ वर्षांत ४ वेगवेगळी सरकारे स्थापन झाली.

86
Israel-Palestine conflict : इस्रायलकडून भारताने काय शिकावे ?
Israel-Palestine conflict : इस्रायलकडून भारताने काय शिकावे ?
  • ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू आहे. त्याच्या अनेक बातम्या रोज धडकत आहेत. या सर्व परिस्थितीत इस्रायलकडून भारताने काय धडा घ्यावा, याविषयी केलेले विश्लेषण! 

इस्रायलची लढवय्यावृत्ती कमी दिसली हमासने अत्यंत जुनाट पद्धतीने इस्रायलच्या सीमेवरील कुंपण फोडले. ट्रॅक्टर, हॅन्ड ग्रेनेड, रिक्षा यांचा वापर केला. अशाप्रकारे कुंपण तोडले जाईल, याची इस्रायलनेही अपेक्षा केली नव्हती. त्या कुंपणापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर लांब युवकांचा कार्यक्रम चालू होता. एवढ्याजवळ हल्ला होत असूनही त्यांना हल्ला होत असल्याचे कळले नाही, हे विशेष आहे. त्या कार्यक्रमात ३-४ हजार युवक होते, तर हल्ला करणारे दहशतवादी १५-२० होते. असे असूनही ते युवक दहशतवाद्यांशी लढू शकले नाहीत; कारण इस्रायलसुद्धा आता सॉफ्ट कंट्री बनत आहे. शहरीकरण वाढले की, लढाऊ वृत्ती कमी होते. लोकांना पांढरपेशी जॉब हवे असतात. त्यामुळे लढाई करण्याची हिंमत गायब होते. ४ हजार युवकांना लढता आले नसते का?

इस्रायलमधील अंतर्गत वादाचा हमासला फायदा
एखाद्या देशातील परिस्थिती नाजूक असते, तेव्हा हल्ला केला, की खूप नुकसान होते. इस्रायलमध्ये गेल्या २ वर्षांत ४ वेगवेगळी सरकारे स्थापन झाली. इस्रायलचे लष्कर, समाज, न्यायव्यवस्था, राजकीय नेते यांत मतभेद निर्माण झाले आहेत. ते एकमेकांमध्ये अंतर्गत वादांमध्ये गुंतले आहेत. ज्या वेळी अशा प्रकारे स्थिती निर्माण होते, तेव्हा शत्रूवरील लक्ष कमी होते. हे वातावरण इस्रायलमध्ये होते, त्याचा फायदा हमासने घेतला. हल्ल्यानंतर जेव्हा नवे सरकार स्थापन झाले, तेव्हा सगळे मतभेद विसरून ते एकत्र आले. अत्यंत कठोर प्रतिहल्ला केला. इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्याची तीव्रता प्रचंड होती, यात शंकाच नाही !

हमासने गाझामध्ये केलेली युद्धतयारी
प्रतिहल्ला करताना टार्गेट ठरवावे लागते. इस्रायलला ते ठरवता आले नाही; कारण गाझामध्ये अनेक नागरिकही राहत होते. गाझातील इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर नागरिक राहतात आणि खालच्या मजल्यावर दहशतवादी राहतात. त्यामुळे इस्रायलला टार्गेट ठरवता आले नाही. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचाही या युद्धात बळी गेला. हासुद्धा हमासच्या डावपेचांचा एक भाग आहे. हमासने गेल्या ९-१० वर्षांत जमिनीच्या खाली भुयारे बनवली आहेत. ती ५०० किलोमीटर लांब भुयारे आहेत. या भुयारांवर सामान्य शस्त्रांचा काही परिणाम होत नाही; कारण ती जमिनीखाली २५-३० मीटर खोलीवर आहेत. त्यामुळे इस्रायल भूमीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

भारताने काय शिकावे ?
आपला शत्रू चीन, पाकिस्तान, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोर प्रत्येक वेळी भारतावर हल्ला करण्यासाठी आधुनिक पद्धत वापरतील. भारतात प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. भारतात Agitational Terrorism (हिंसक आंदोलने आणि घातपाताचा दहशतवाद) होईल. वेगवेगळ्या कारणाने आंदोलने, रस्ते बंद करणे, रेल्वेचे घातपात घडवून आणणे, अशी माध्यमे वापरली जातील.

– आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. इस्रायलचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर त्यांच्याकडे क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करणारे आयर्न डोम होते. पण ते वेळेत चालले नाही. भारताकडे पण असे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी पण माणूसच लागतो. ती व्यक्ती कमी पडून चालत नाही. तिचे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पुण्यातच पाहायला गेलो, तर हजारो ठिकाणी cctv बसवलेले आहेत. त्यांचा चोरी, काही अपलाभ होऊ नये, यासाठी वापर किती प्रमाणात होतो.
– शस्त्राला प्रतिहल्ला करणारे शस्त्र बनवले जातेच. क्षेपणास्त्र बनवले, तर ते नष्ट करणारे अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र बनवले जाते. असे सतत घडत असते. तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. त्यापैकी आपल्या शत्रूविरुद्ध कोणते तंत्रज्ञान वापरायचे आहे, ते आपण निश्चित केले पाहिजे.
वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानने पंजाबमध्ये २८८ वेळा ड्रोन पाठवून १५-१६ हजार किलो चरस, अफू, गांजा पाठवला. पाकिस्तानच्या या ड्रोन युद्धाला आपले उत्तर शून्य आहे. आपण उत्तर देऊ शकलो नाही, हे भारतीय यंत्रणांचे अपयश आहे.
– आता पाकिस्तान पारंपरिक युद्ध करणार नाही; कारण त्याने हल्ला केला, तर सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, हे त्यालाही माहिती आहे. त्यामुळेच पाककडून भारतात हजारो किलो अमली पदार्थ पाठवले जात आहेत. बांगलादेशी घुसखोरी वाढत आहे. पाककडून बनावट नोटा भारतात पाठवल्या जात आहेत. ही युद्धाची बदलती आव्हाने आहेत. त्याचा सामना कसा करावा, हे ठरवले पाहिजे.
– सामाजिक माध्यमांच्या वापरावरही नियंत्रण आणायला हवे. सोशल मीडिया, फेसबुक पोस्टमुळे दंगली होत आहेत. त्यासाठी माझे असे मत आहे की, सोशल मीडिया, फेसबुक ही अकाउंट नोंद करण्यासाठी त्याला आधारकार्ड नोंद करणे आवश्यक आहे. तरच खोटी, बनावट खाती उघडून केल्या जाणाऱ्या देशद्रोही, भडकावू लिखाणावर मर्यादा येईल.
– आपत्तीच्या काळात कसे वागायचे, याचे सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण देणे आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.