वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांचा ज्या तरुणांना स्पर्श झाला, त्यांच्यापैकी कोणी क्रांतिकारक झाले, कोणी जाती निर्मूलनासाठी, तर कोणी सैन्यात भरती झाले. आज देशामध्ये ते हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आहेत, त्यामागे वीर सावरकरांची फार मोठी पुण्याई आहे. आज भारताची प्रतिष्ठा संपूर्ण जगामध्ये वाढली आहे, त्यामागे देशाने अंगीकारलेला सावरकरविचारच आहे, असे उद्गार प्रसिद्ध व्याख्यात्या गीता उपासनी (Geeta Upasani) यांनी काढले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या (Mumbai) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी गीता उपासनी बोलत होत्या. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासाचार्य राजवाडे सभागृहात हा कार्यक्रम रविवार, १ जून या दिवशी संपन्न झाला. या कार्यक्रमात ‘तरूणाईला उमगलेले सावरकर’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी मयूर भावे यांनीही ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
गीता उपासनी या सोहळ्यात पुढे म्हणाल्या की, वीर सावरकरांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. त्या काळचे तरुण म्हणत की, एखाद्या मरणासन्न व्यक्तीसमोर वीर सावरकरांचे भाषण झाले, तर तीही खडबडून उठेल. तिच्यात वीरश्री संचारेल आणि ती युद्धाला सिद्ध होईल इतके ते प्रभावी होते. जेव्हा परकीय शत्रूंना परास्त करायची वेळ आली, तेव्हा हाती शस्त्रच घ्यावे लागते, हे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात सावरकर बोध करून देतात की, नको त्या ठिकाणी दया दाखवणे, नको त्या ठिकाणी क्षमा करणे, या सद्गुण विकृतीमुळेच आपले शत्रू विजयी होत गेले आहेत.
जेव्हा तरुणाईला अधिकाधिक सावरकर उमगायला लागतील, तस तसे तरुण अभिरुचीसंपन्न होतील, विचारसंपन्न होतील आणि कार्यप्रवण होतील. ते देव, देश, धर्मभक्त होऊन वीर सावरकरांच्या स्वप्नातील हिंदु राष्ट्र निर्माण होईल.
असा संपन्न झाला सोहळा
कार्यक्रमाच्या आरंभी श्रीनिवास शिंदगी यांनी लिहिलेली वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली सावरकरांची आरती विभा हरिश्चंद्रकर, सानिका फडके आणि श्रीरंग जोशी यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली. आशिष जोशी यांनी त्याच्या खास शैलीत सगळ्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीरंग जोशी यांनी ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला’ हे गीत सादर केले. या गीताचे संगीत दिग्दर्शन वर्षा भावे यांनी आणि संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे. भक्ती पागे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने पुण्यात प्रथमच सावरकर जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमा मागची भूमिका कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी विशद केली आणि प्रत्येक वर्षी पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही जाहीर केले.
मायदेश फाऊंडेशनचे अरुण जोशी, इतिहास संशोधक पांडुरंग बळकवडे, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. स्मारकाचे पदाधिकारी राजेंद्र वराडकर, स्वप्नील सावरकर, शैलेंद्र चिखलकर, संतोष कारकर, सौरभ धडफळे, प्रांजल अक्कलकोटकर हेही या वेळी उपस्थित होते. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community