Swami Govind Dev Giri ji Maharaj : स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराजांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

316

स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri ji Maharaj) यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आळंदी येथे आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अयोध्या येथील कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज, अवधेशानंद महाराज, ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर, राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामदेव महाराज, रमेशभाई ओझा, आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, गिरीधर काळे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा : Bharat Ratna : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी)

संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली. ज्या भूमीतून हे कार्य झाले त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिले. स्वामी श्री गोविंददेव गिरिजी महाराज यांनी ८१ देशात लाखो लोकांपर्यंत भगवद्गीता पेाहोचविण्याचे कार्य केले. ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविले, त्या माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणाऱ्या विद्वानाचा सत्कार होणे हा चांगला योग आहे. स्वामी श्री गोविंददेव गिरी (Swami Govind Dev Giri ji Maharaj) यांनी राष्ट्राची आणि सृष्टीची चिंता केल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे, असे फडणवीस म्हणाले.

स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri ji Maharaj) यांनी आपल्या मधूर वाणीने आध्यात्म विचाराच्या प्रसाराचे कार्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या. स्वामी श्री गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, गीता परिवार, महर्षी वेद व्यसास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरूकुलाच्या माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्षे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, वेदवाङ्मयाबाबत देशविदेशात प्रबोधनाचे काम केले आहे. व्रतस्थ वृत्तीने त्यांचे कार्य आजही सुरू आहे. आध्यात्मिक मूल्यांचे पालन, संवर्धन करतांना त्यांनी आध्यात्म विचार सर्वदूर पोहोचविला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.