रत्नागिरीतील वीर सावरकर विद्यालयाला आवश्यक निधी देणार! उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

106

रत्नागिरी जिल्ह्यातील परटवणे या गावी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या माध्यमातून वीर सावरकर यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल, या शाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या वेळी दिले.

वीर सावरकरांच्या नावाला डाग लागेल असे कार्य करणार नाही

या शाळेची पटसंख्या मागील ६-७ वर्षांत कमी झालेली आहे. सध्या या शाळेत ७ वीपर्यंतच्या वर्गांमध्ये केवळ १४ विद्यार्थी शिकत आहेत. कोरोनाच्या काळात २-अडीच वर्षांत या शाळेकडे दुर्लक्ष झाले. या शाळेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव आहे, तो वारसा जपण्यासाठी जो काही निधी लागेल तो देण्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु त्या शाळेत सध्या शिकत असलेले १४ विद्यार्थी त्यांना त्याच ठिकाणी शिकायला ठेवायचे की बाजूच्या काही अंतरावर असलेल्या शाळेत त्यांना स्थलांतरित करायचे या विषयावर नगरपालिका निर्णय घेणार आहे. नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ची बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्याची दखल घेत मी स्वतः प्रशासकांना या विषयात लक्ष घातले पाहिजे, असे सांगितले आहे. वीर सावरकर यांच्या नावाला डाग लागेल, असे कार्य आमच्या हातून होणार नाही. भविष्यात जर या शाळेचे स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला तर त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती कशा जागृत ठेवता येतील, त्यावरही निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

(हेही वाचा २१ एप्रिल १६५९ : रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा दिवस)

‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची मंत्री सामंतांकडून दखल

रत्नागिरी जिल्ह्यातील परटवणे या गावी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची बाब सर्वप्रथम ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या रिपोर्टद्वारे समोर आणण्यात आली. स्वतः स्वातंंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने ही शाळा सुरू करण्यात आली होती. पण आता मात्र या शाळेची दूरवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. भागोजी शेठ कीर यांच्या सहाय्याने ही शाळा उभारण्यात आली. या शाळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले आहे. ही शाळा सध्या रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत आहे. स्थानिक प्रशासनाकडून या शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे, तर राज्यात सुद्धा महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना सत्तेत आहे. मातोश्रीच्या जवळचे समजले जाणारे मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात ही शाळा आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे ठाकरे सरकार कधी लक्ष देणार, असा प्रश्न या निमित्ताने ‘हिंदुस्थान पोस्ट’ने उपस्थित केला होता, त्या वृत्ताची मंत्री सामंत यांनी दखल घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.