-
प्रतिनिधी
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील प्रमुख सरदार रघुजी भोसले (Raghuji Bhosale) यांची लंडनमधील सॉदबीजच्या लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने मध्यस्थामार्फत जिंकून मिळवली आहे. ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. परदेशातील लिलावातून ऐतिहासिक वस्तू परत मिळवण्याची महाराष्ट्राची ही पहिलीच वेळ आहे. याबद्दल शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
काल या तलवारीच्या लिलावाची बातमी समजताच शेलार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तलवार शासनाच्या ताब्यात येण्यासाठी नियोजन केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यावर दूतावास संपर्क आणि समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि शेलार यांनी रात्री उशिरापर्यंत नियोजन आणि संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, शेलार यांनी मध्यस्थ नियुक्त करून लिलावात सहभाग घेतला आणि तो जिंकला. यासाठी हाताळणी, वाहतूक आणि विमा खर्चासह सुमारे ४७.१५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक क्षण सरकारच्या नावे नोंदवला गेला आहे. “हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
(हेही वाचा – BMC : मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामावर ‘वॉर रुम’ द्वारे करडी नजर)
तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले (Raghuji Bhosale) प्रथम (१६९५-१७५५) हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांचे प्रमुख सरदार होते. त्यांच्या शौर्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली. रघुजींनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमा यशस्वी करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. त्यांनी चांदा, छत्तीसगड, संबळपूर, कुड्डाप्पा आणि कर्नूलवरही वर्चस्व प्रस्थापित केले. अठराव्या शतकातील धाडसी मराठा सेनानी म्हणून त्यांची ख्याती आहे.
ही तलवार मराठा शैलीतील ‘फिरंग’ पद्धतीची आहे, ज्यामध्ये युरोपीय बनावटीचे सरळ, एकधारी पाते आणि सोन्याच्या कोफ्तगरी नक्षीकाम असलेली मुल्हेरी मूठ आहे. पात्यावर ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ असा देवनागरी लेख सोन्याने लिहिलेला आहे, जो तलवार रघुजींसाठी (Raghuji Bhosale) बनवल्याचा पुरावा आहे. हिरव्या कापडाने गुंडाळलेली मूठ आणि युरोपीय पात्याचा वापर तत्कालीन आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापार दर्शवतो.
१८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांचा खजिना लुटला, त्यात ही तलवार देशाबाहेर गेली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही तलवार मराठा शस्त्रकलेतील अपवादात्मक नमुना आहे, कारण मराठा शस्त्रांवर नक्षीकाम आणि नावाचा लेख दुर्मीळ आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि रघुजी भोसले यांच्या शौर्याचा गौरव पुन्हा अधोरेखित झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community