Veer Savarkar : एक पाऊल राष्ट्रीय एकात्मकतेकडे…

117
  • मधुरा कुलकर्णी

सावरकरांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हर घर सावरकर समिती कटीबद्ध आहे.
‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू’

या सावरकरांच्या हिंदू संघटनाच्या मंत्राला आदर्श मानून अनेक सावरकर प्रेमींनी एकत्र येऊन हाती धरलेला हा वसा. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे देशभरात अनेक प्रकारे साजरे केले गेले तसेच अनेक समाजोपयोगी कार्यक्रम देखील या आनंदाप्रित्यर्थ साजरे होऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असामान्य भूमिका असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि त्यांच्या उद्दिष्टाला घराघरात पोहोचवण्यासाठी हर घर सावरकर समितीची स्थापना झाली. यावर्षी ७५ कार्यक्रम घ्यावेत असा समितीचा मानस आहे. घराघरात सावरकरांचा विचार कसा पोहोचवता येईल? यासाठी खाजगी पातळीवर नियोजनाचे काम सुरू झाले आणि त्यासाठी हे शिवधनुष्य पेलण्यास पुढे राजाश्रय देखील मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सत्कार्याबरोबर जोडले गेले. जानेवारी महिन्यापासून हर घर सावरकर समितीच्या पुण्यात अविरत बैठका सुरू झाल्या. हर घर सावरकर उपक्रमाच्या अंतर्गत प्रामुख्याने महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरून सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, सावरकर संबंधित संस्था, लेखक, व्याख्याते, व्यक्ती यांची शिखर बैठक मुंबईत घेण्यात आली. २१ मे रोजी शिवरायांना रायगडावर जाऊन मानवंदना देण्यात आली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांच्या उत्कट प्रतिभेने रचलेल्या शिवरायांची आरती एकमुखाने गाण्यात आली.

गणपती म्हणजे गणांना पती
गण म्हणजे राष्ट्र, त्या शक्तिचे, संघटनेचे जे दैवत ते गणपती! अगदी वैदिक कालापासून आपल्या भारतीय राष्ट्राची गणदेवता आहे.

• स्वा. सावरकर (स. सा. वा., 2001, खंड-5, पृ. 332)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) गणेशोत्सवाविषयी असलेला विचार हा केवळ अध्यात्मिक नसून राष्ट्रीय एकात्मतेचा आहे. सावरकरांच्या समग्र आयुष्याचे उद्दिष्ट म्हणजे लोकोपयोगी कार्य. लंडनमध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या या तेजस्वितेची जपणूक करण्यासाठी हर घर सावरकर समितीतर्फे ‘गणेशोत्सव देखावा स्पर्धा २०२३’ या राज्य पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये कौटुंबिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समिती, शाळा, सामाजिक संस्था सर्वजण सहभागी होऊ शकतात. या देखाव्यासाठी विषय असणार आहे, ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’

(हेही वाचा Indian Navy : नौदलाची ताकद वाढणार; चीनला टक्कर देणाऱ्या कोणकोणत्या युद्धसामग्रींचा होणार समावेश, जाणून घ्या…)

सावरकरांचे ८३ वर्षांचे आयुष्य हे संपूर्ण तळमळीचे, त्यागाचे, क्रांतीचे, शौर्याचे आहे. यापैकी कुठलाही एक प्रसंग कौटुंबिक किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या गणपती देखाव्यामध्ये दाखवून सावरकरांचे दैदीप्यमान चरित्र जनमानसात पोहोचवणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. अनेक आकर्षक बक्षीसे या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी असणार आहेत. त्यामध्ये ओलाची इलेक्ट्रिक बाइक, अंदमानची सफर, ट्रॅक्टर अशा अनेक आकर्षक बक्षीसांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मची नोंदणी आवश्यक आहे आणि १९ सप्टेंबर २०२३ रोजी हर घर सावरकरच्या फेसबुक पेजवरून हा गुगल फॉर्म प्रदर्शित करण्यात येईल. केवळ नाममात्र शहरांना सावरकरांची ओळख असून चालणार नाही. सावरकर चरित्र हे अनंत काळापर्यंत एक वारसा आहे आणि तो प्रत्येक घराघरात पोहोचावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन मोठ्या राज्य पातळीवर करण्यात आलेले आहे. यासाठी भरघोस प्रतिसादाची वाट हर घर सावरकर समिती बघत आहे. १९३५ च्या किर्लोस्कर मधल्या अंकात सावरकर म्हणतात, ‘गणपती महोत्सव म्हणजे हिंदुसंघटनेच्या हातचे एक प्रबळ हत्यार होय. आमच्या हिंदुराष्ट्राचा, राष्ट्रीय आकांक्षेचा तो एक प्रचंड ध्वनिक्षेप नि ध्वनिवर्धक आहे.’ तात्यारावांच्या या अपेक्षेला न्याय देऊया. कुसुमकोमल कवी, राजकारणी, नाटककार, इतिहासकार, चरित्रकार, आत्मचरित्रकार यासारख्या असंख्य क्षेत्रांमध्ये ज्यांची कीर्ती दुमदुमते अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) निनाद आपल्या घराघरातून होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.