-
प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा यासाठी शासन लवकरच समग्र योजना आणणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतमाल वाहतुकीसाठी आणि शेतांपर्यंत पोहोच सुलभ करण्यासाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून नवी समग्र योजना आखण्यात येणार आहे. शेतरस्त्यांसाठी कौशल्यावर आधारित काम केले जाईल. गाव रस्ते योजना (२५-१५ योजना) मधील ५० टक्के निधी शेतरस्त्यांसाठी वापरण्याचा विचार केला जात आहे.”
या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार असून, एक महिन्यात उपाययोजनांचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत आमदार अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. विजय वडेट्टीवार आणि सुमित वानखेडे यांनीही उपप्रश्न विचारून मुद्दा उपस्थित केला.
(हेही वाचा – पुण्यात शिवसेना उबाठा, मनसेला मोठा झटका; DCM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश)
महसूल मंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिले की,
- शेतरस्ता प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंतच निकाली काढण्याची व्यवस्था केली जाईल.
- शेतरस्त्यांचे सर्वेक्षण, गाव नकाशात समावेश, सपाटीकरण लोक अदालतीच्या माध्यमातून तातडीने पूर्ण केले जाईल.
- प्रत्येक शेतरस्ता किमान १२ फूट रुंद असणार.
- जमाबंदी आयुक्तांमार्फत शेतरस्त्यांना क्रमांक देणे बंधनकारक असेल.
- रोजगार हमी योजना, ग्रामविकास व महसूल विभागाचा निधी एकत्रितपणे वापरण्यात येणार.
- स्वतंत्र लेखाशिर्ष निर्माण करून कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाईल.
या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना शेतरस्त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

