भीषण दुर्घटना: ब्रिज तुटला, 20 फुटांवरून प्रवासी खाली कोसळले

107

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय निलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेत 13 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना तातडीची मदत करत रेल्वे प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

प्लॅटफाॅर्म नंबर 1 आणि 2 यांना जोडणारा हा पादचारी पूल असून रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान या पुलाचा एक भाग कोसळला. पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेने ओव्हर हेड वायर, पादचारी पुलाचा भाग पु्न्हा एकदा दुरुस्त करण्याचे काम सुरु केले आहे. या अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर प्लॅटफाॅर्म क्रमांक 1 वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी अभियंते रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या अधिकच्या वजनाने हा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: धक्कादायक! मुंबईतील बारमध्ये चिकनऐवजी दिले जातेय ‘कबुतर स्टार्टर’? )

पालकमंत्र्यांकडून दखल

जखमींपैकी काही रुग्णांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी कळताच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत सर्व जखमींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.