Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत ५९ टक्के वाढ – नितीन गडकरी

147
Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत ५९ टक्के वाढ - नितीन गडकरी
Nitin Gadkari : राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत ५९ टक्के वाढ - नितीन गडकरी

देशात गेल्या ९ वर्षात राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे ५९ टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते आज, मंगळवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, देशात २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी ९१ हजार २८७ किमी होती, जी २०२२-२३ मध्ये १ लाख ४५ हजार २४० किमीपर्यंत वाढली असून या कालावधीत ही लांबी ५९ टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे गेल्या ९ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची लांबी १८,३७१ किमी होती जी गेल्या नऊ वर्षात ४४,६५४ किमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

फास्टॅग लागू झाल्यामुळे पथकर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. पथकारामधून मिळणारा महसूल २०१३-१४ मधील ४,७७० कोटी रुपयांवरून २०२२-२३ मध्ये ४१,३४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. २०३० पर्यंत पथकर महसूल १ लाख ३० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.फास्टॅगमुळे पथकर नाक्यांवर होणारा खोळंबा कमी झाली आहे. “२०१४ मध्ये पथकर नाक्यांवरचा प्रतीक्षा कालावधी ७३४ सेकंदांचा होता, तर २०२३ मध्ये तो ४७ सेकंदांवर आला आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही हा कालावधी लवकरच ३० सेकंदांपर्यंत खाली आणू, असे नितीन गडकरी म्हणाले.

(हेही वाचा – Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंना बळ; कल्याणमध्ये ‘महा हब’साठी ५०० कोटी मंजूर)

भारतातील प्रवासाच्या अनुभवांमध्ये फास्टॅगमुळे पडलेल्या परिवर्तनीय प्रभावाबद्दल सांगताना, फास्टॅगने पथकर भरण्याच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे आणि रोख व्यवहारांची गरज संपुष्टात आणली आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. एका संशोधनानुसार, या महत्वाच्या उपक्रमामुळे पथकर नाक्यांवर वाहने थांबल्यामुळे वाया जाणार्या इंधन खर्चात अंदाजे ७० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. ईशान्य भागात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे, असे गडकरी यांनी सांगितले. या प्रदेशात २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत असे ते म्हणाले. प्रवासाचा सुखद अनुभव मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने ६७० सुविधा विकसित केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

हरित उपक्रमांच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले की, एनएचएआयने ने गेल्या नऊ वर्षांत ६८ हजारांहून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण केले, तर ३.८६ कोटी वृक्षांची लागवड केली. एनएचएआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर १५ हजारांहून अधिक अमृत सरोवरे विकसित केली आहेत, अशी माहिती त्यांनी जल पुनरुज्जीवन उपक्रमांबद्दल बोलताना दिली.मंत्रालयाने दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत ३० लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी बांबू क्रॅश बॅरिअर्सविषयी माहिती दिली.हे बांबू बॅरिअर्स रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत रस्ते अधिक टिकाऊ बनवतात असे ते म्हणाले. शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून गडकरी यांनी पुढील पाच वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, स्वच्छ ऊर्जेला चालना देणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा दृष्टीकोन मांडला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.