Mill Workers साठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील २५२१ सदनिकांची लवकरच सोडत

बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार तथा वारसांना चावी वाटप.

118
Mill Workers साठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील २५२१ सदनिकांची लवकरच सोडत
Mill Workers साठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील २५२१ सदनिकांची लवकरच सोडत

गिरणी कामगारांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ‘म्हाडा’ला प्राप्त होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रांजगोळी, रायचूर व रायगड जिल्ह्यातील कोल्हे येथे प्राप्त होणाऱ्या २५२१ सदनिकांची सोडत लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी केले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमांतर्गत मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १३१ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंगळवारी चावी वाटप करण्यात आले. यावेळी अतुल सावे बोलत होते.

सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३०३८ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार तथा वारस यांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चावी वाटपाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत बुधवारी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते.

अतुल सावे म्हणाले की, मुंबईतील ५८ बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांत गिरणी कामगारांना सदनिका मिळण्यासाठी सुमारे ०१,७४,००० गिरणी कामगार तथा वारस यांनी सन २०१०,सन २०११, सन २०१७ मध्ये अर्ज केले होते. त्यापैकी १०,७०१ गिरणी कामगारांना सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सोडतींमधील यशस्वी अर्जदार व दुबार अर्जदारांचे अर्ज वगळून ही संख्या ०१,५०,४८४ वर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडाकडून व कामगार विभागाकडून गिरणी कामगारांच्या अर्जाची छाननी व पात्रता निश्चितीची कार्यवाही वेगाने सुरू आहे.

(हेही वाचा – Rishabh Pant With Indian Team : जायबंदी रिषभ पंत जेव्हा भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी झाला…)

ठाणे जिल्ह्यातील रांजगोळी येथे उपलब्ध होणाऱ्या घरांची दुरुस्ती सुरू असून हे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. येत्या वर्षभरात गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. काही गिरणी कामगारांनी पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून पश्चिम महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी काही योजना राबवता येईल का याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे अतुल सावे यांनी सांगितले.

गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे म्हणाले की, येत्या सप्टेंबरपर्यंत बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील ५०० यशस्वी पात्र गिरणी कामगार तथा वारस यांना सदनिकांच्या चावीचे वाटप केले जाणार आहे. विजया दशमीपर्यंत या सोडतीतील सर्व गिरणी कामगारांना चावी वाटप करण्याचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील मौजे कोन येथील एमएमआरडीएने उभारलेल्या व सन २०१६ मध्ये जाहीर सोडतीतील १९४८ यशस्वी गिरणी कामगार तथा वारस यांना ऑक्टोबरमध्ये सदनिकांचा ताबा दिला जाणार असल्याचे आमदार सुनील राणे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.