शिवसेनेत उभी फूट पडल्यावर शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत. अशा वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. याबाबत पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारणा केली असता, ‘त्यांनी साद घातली तर येऊ देत’, असे सांगत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. शिवसेनेने जर साद घातली तर याबाबत विचार करण्यात येईल, असे संकेत शर्मिला ठाकरे यांनी दिले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी माध्यमांनी प्रश्न विचारलेला असताना शुभेच्छा आहेत, असे उत्तर दिले.
विनायक राऊत म्हणतात उद्धव ठाकरे ठरवतील
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकतील का, या चर्चांवर शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या या उत्तरानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना सोलापुरात याबाबत विचारणा केली. त्यांनी याबाबतची कोणतीही चर्चा आपल्या कानावर नसल्याचे सांगितले खरे, मात्र याबाबतचे निर्णय करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे सांगत त्यांनी ही शक्यता फेटाळली नाही. शिवसेनेकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जरी प्रस्ताव आला तरी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील. यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना भेटले आहेत. त्यांना भेटून आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्हाला युतीबाबतचा काही प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षप्रमुख निश्चित विचार करतील. राज ठाकरे यांनी मात्र या सगळ्या काळात शिवसेनेला सहानभूती घेण्याची भूमिका घेतली नाही. बंडाच्या काळात राज ठाकरे यांचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी त्यांनी या बंडाबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. बंडाच्या काळात एकनाथ शिंदे हे फोनवर राज ठाकरे यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती होती. पक्षांतर बंदीचा कायदा लागू झाल्यास, हे सर्व आमदार राज ठाकरे यांच्या मनसेत जातील असेही सांगण्यात येत होते.
(हेही वाचा शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला?)
Join Our WhatsApp Community